मुंबई – ‘जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील सर्वोच्च आनंद, समाधान आणि भाग्याचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझे दायित्व अधिक वाढले आहे. सर्वसामान्यांचे दुःख दूर करणे हाच माझा धर्म आहे. या पुरस्काररूपी आशीर्वादामुळे मला ‘कॉमन मॅन’ला ‘सुपरमॅन’ करण्यासाठी बळ मिळो, अशी प्रार्थना करतो,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वारकरी संप्रदायातील मानाचा ‘जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान झाल्याबद्दल विधानसभेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला.
या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. वारकरी, शेतकरी, माझ्या लाडक्या बहिणी-भावंडांचेही तो आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि महाराष्ट्र सेवेचे व्रत दिले, तर धर्मवीर आनंद दिघे यांनी जनसेवेचे संस्कार दिले. तुकोबांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे त्या संस्कारांचा सन्मान आहे.
मुख्यमंत्री असताना वारकरी संप्रदायासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
• पहिल्यांदाच वारकरी दिंड्यांसाठी अनुदान दिले.
• वारकरी विमा योजना सुरू करून वारकऱ्यांचा विमा काढला.
• वारीमध्ये लाखो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
• पालखी मार्ग आणि पंढरपूर विकासाची कामे मार्गी लावली.
• विठ्ठल दर्शन रांगांसाठी निधी मंजूर केला.
• ‘ब’ कॅटेगरीतील तीर्थक्षेत्र मंदिरांच्या निधीत वाढ करून २ कोटींवरून ५ कोटी रुपये केला.
• वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले.
‘‘वारकरी संप्रदायाहून कोणीही मोठे नाही. त्यांच्या समाजावर असलेल्या उपकारांची परतफेड सात जन्म घेतली, तरी होणार नाही. हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे आणि मी वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटीबद्ध राहीन,’’ असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.