धरणातून उपसल्या जाणाऱ्या पाण्याच्या सहापट बाष्पीभवन, प्रशासनाची कसोटी
By : गुलाब भावसार
छत्रपती संभाजीनगर: पैठण तालुक्यात प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यावरही त्याचा थेट परिणाम होत आहे. तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनाद्वारे नष्ट होत आहे. विशेष म्हणजे, धरणातून दररोज उपसल्या जाणाऱ्या पाण्याच्या तब्बल सहापट पाणी दररोज फक्त वाफ होऊन उडत आहे, ही बाब जलसंपदाविभागासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
मार्च महिन्यात एकूण ५५.२८५ दलघमी पाणी वाफ होऊन नष्ट झाले, तर १ जुलै २०२४ पासून आत्तापर्यंत एकूण २४३.७३ दलघमी पाणी हवेत वाफ होऊन गेले आहे. मंगळवारीच एकट्या दिवशी १.९८८ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले. ही आकडेवारी लक्षात घेतल्यास, पुढील आठवडे तापमान अधिक राहिल्यास धरणातील साठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जायकवाडी धरण यंदा १०० टक्के भरले गेले होते. १५ एप्रिल २०२४ रोजी धरणातील साठा ४७.३९ टक्के इतका आहे, जो मागील वर्षाच्या फक्त १५.२० टक्क्यांच्या तुलनेत तब्बल तीनपट अधिक आहे. सध्या धरणात १७६७.०१ दलघमी साठा असून त्यातील १०२८.९० दलघमी पाणी उपयुक्त आहे. मात्र, उच्च तापमानामुळे हा साठा वेगाने कमी होतो आहे.
शासन आणि जलसंपदामंडळानुसार, दररोज केवळ ०.२९ दलघमी पाणी उपसा होतो आहे. त्यामुळे पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्यात कपात होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पण, त्याचवेळी बाष्पीभवनाचा दर त्याच्या सहापट आहे, ही चिंतेची बाब आहे.
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, वाळूज, शेंद्रा, बिडकीन, चितेगाव, पैठण, जालना आणि डीएमआयसी या प्रमुख भागांना पाणीपुरवठा होतो. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. आता त्यात बाष्पीभवनामुळे निर्माण झालेला तणावही जोडला गेला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग आणखी वाढू शकतो. परिणामी, जलसंपदाविभागाने पाण्याच्या काटेकोर व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना करणं आवश्यक ठरणार आहे.
(लेखक गुलाब भावसार हे बीड येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)