मुंबई : राज्यातील आधार केंद्र चालकांच्या मानधनात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. यापुढे एका आधार नोंदणीसाठी चालकांना २० रुपयांऐवजी ५० रुपये दिले जाणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड. आशिष शेलार यांनी दिली.
राज्य सरकारकडून डिजिटल सेवांचा विस्तार झपाट्याने केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवीन व अद्ययावत आधार संच उपलब्ध करून देण्याची मागणी आधार केंद्र चालकांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत नवे आधार संच राज्यभरात पुरवले जात आहेत.
आज रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील सुमारे १०० आधार केंद्र चालकांना आधार संच सुपूर्त करण्यात आले.
या प्रसंगी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, जिल्हाधिकारी आंतल गोयल (मुंबई शहर), राजेंद्र क्षीरसागर (मुंबई उपनगर) आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
राज्यात आजपर्यंत १२ कोटी ८० लाख आधार कार्ड नोंदणी पूर्ण झाली आहे. मात्र ० ते ५ वयोगटातील केवळ ३९% बालकांची नोंदणी झाली असून ५ ते १७ वयोगटातील बायोमेट्रिक नोंदणीतही प्रगती अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे या वयोगटातील नोंदणी वाढवण्यासाठी सरकारने प्रोत्साहनपर योजना सुरू केली आहे.
याअंतर्गत पुढील तीन महिन्यांत सर्वाधिक नोंदणी करणाऱ्या केंद्र चालकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या योजनेत विभागनिहाय —
• प्रथम क्रमांकासाठी ₹१ लाख,
• द्वितीय क्रमांकासाठी ₹५०,०००,
• तृतीय क्रमांकासाठी ₹३०,०००
रूपये देण्यात येणार असल्याचेही अँड. आशिष शेलार यांनी जाहीर केले.