तब्बल दीड कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी पूर्ण
मुंबई : “संघटन पर्वा” अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाने राज्यभरात दीड कोटींपेक्षा अधिक प्राथमिक सदस्य आणि १ लाख ३४ हजारांहून अधिक सक्रिय सदस्यांची नोंदणी करून विक्रमी यश मिळवले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल प्रदेश कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार अरुण सिंह यांनी महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.
खा. सिंह यांनी या वेळी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात “संघटन पर्व” अत्यंत यशस्वी ठरत आहे. पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
खा. सिंह म्हणाले की, आतापर्यंत ७० टक्के बुथ समित्यांचे गठन पूर्ण झाले असून येत्या २२ एप्रिलपर्यंत १ लाख बुथ समित्यांचे लक्ष्य गाठण्यात येणार आहे. प्रत्येक बुथमध्ये १२ सदस्य असतात, त्यामुळे १२ लाख सक्रिय कार्यकर्त्यांची मजबूत फळी भाजपला लाभणार आहे. ही फळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी कार्यरत असेल.
भाजपमध्ये संघटन सर्वोपरि या तत्त्वावर काम होत असून अंतर्गत लोकशाही, सामूहिक निर्णयप्रक्रिया आणि परस्पर संवाद ही पक्षाची खास वैशिष्ट्ये असल्याचेही खा. सिंह यांनी सांगितले. त्यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचाही उल्लेख करत फडणवीस सरकार उत्तम काम करत असल्याचे प्रमाणपत्र दिले.
कार्यकारी अध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले की, जानेवारी २०२५ पासून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण केले. आतापर्यंत सुमारे १.४० लाख सक्रिय सदस्यांची नोंदणी झाली असून ३ लाख सक्रिय सदस्य गाठण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
येणाऱ्या २० एप्रिल रोजी राज्यातील सर्व ११९६ मंडळ अध्यक्षांची निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखीखाली होणार असून त्यानंतर २२ एप्रिलपासून नवीन जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
एका प्रश्नाच्या उत्तरात खा. अरुण सिंह म्हणाले की, सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी एका कंपनीकडून ७ कोटी रुपयांना जमीन खरेदी करून चार महिन्यांत तीच जमीन ५८ कोटी रुपयांना परत त्या कंपनीलाच विकली. केवळ चार महिन्यांत एवढ्या मोठ्या किंमतीत जमीन विक्रीचा व्यवहार झाला असल्याने त्याची चौकशी होणारच, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.