महाराष्ट्र ताज्या बातम्या

पक्षनिष्ठेचे बक्षीस नाकारले गेले का? काकासाहेब कुलकर्णींची काँग्रेससमोर भावनिक खदखद

प्रा. काकासाहेब कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते

सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेची संधी हुकल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी मनातील वेदना उघडपणे व्यक्त केली आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर कायम ठेवत त्यांनी विचारलेला प्रश्न मात्र काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेला आवाज देणारा ठरत आहे.

सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी उमेदवारीची संधी पुन्हा एकदा हुकल्यानंतर आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली असून, “पक्षनिष्ठेचे बक्षीस नाकारले गेले का?” असा थेट पण संयत प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी, ही त्यांची स्वाभाविक अपेक्षा होती. अनेक वर्षांपासून पक्षासाठी केलेले काम, संघटनात्मक जबाबदाऱ्या, जनतेशी सातत्यपूर्ण संपर्क, काँग्रेसच्या विचारधारेप्रती निष्ठा आणि स्वतःचे मेरिट या बळावर त्यांनी ही अपेक्षा ठेवली होती. मात्र पक्षाने वेगळा निर्णय घेतल्याने त्यांच्या वाट्याला पुन्हा प्रतीक्षा आणि निराशा आली, अशी वेदना त्यांनी व्यक्त केली.

ही खंत केवळ एका उमेदवारीपुरती मर्यादित नाही. कुलकर्णी यांच्या मते, यापूर्वी माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या कार्यकाळातही विधान परिषदेची संधी त्यांच्यापासून हुकली होती. त्यावेळीही त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य केला, वैयक्तिक वेदना बाजूला ठेवल्या आणि पक्षासाठी पूर्वीइतक्याच ताकदीने काम सुरू ठेवले. मात्र आता सलग दुसऱ्यांदा तसाच प्रसंग घडल्याने मनात अस्वस्थता निर्माण होणे साहजिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“माझी चूक नेमकी काय आहे? मी पक्षासाठी कमी काम केले का? संघर्षात कधी मागे राहिलो का? पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो का?” असे प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केले आहेत. त्यांच्या या प्रश्नांतून वैयक्तिक नाराजीपेक्षा पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनातील दीर्घकाळ साचलेली वेदना अधिक तीव्रतेने व्यक्त होते.

कुलकर्णी यांनी गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा आक्रमक आणि अभ्यासू प्रवक्ता म्हणून पक्षाची भूमिका राज्यभरातील वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे आणि डिजिटल माध्यमांतून मांडली आहे. सरकारच्या धोरणांवर परखड टीका करणे, काँग्रेसची बाजू ठामपणे मांडणे आणि पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, हे त्यांचे सातत्यपूर्ण काम राहिले आहे. त्यामुळे माध्यमविश्वात आणि राजकीय वर्तुळात त्यांची ओळख काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून निर्माण झाली आहे.

याच योगदानाची दखल घेतली जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र उमेदवारीचा निर्णय त्यांच्या बाजूने न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी कोणावरही आरोप करण्याचे टाळले आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु मनातील खदखद लपवणे आता कठीण झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कुलकर्णी यांच्या निवेदनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी नाराजीला बंडाचे रूप दिलेले नाही. “हा प्रश्न बंडाचा नाही, तर एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या अंतर्मनातील वेदनेचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाविषयीची निष्ठा अबाधित असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसची विचारधारा, सामान्य कार्यकर्त्यांवरील विश्वास आणि जनतेची सेवा करण्याची बांधिलकी कायम राहील, असेही म्हटले आहे.

त्यांनी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते, काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मित्र, पत्रकार आणि हजारो कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकला, अनेक माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्या कामाचा उल्लेख केला आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी भावना व्यक्त केल्या. या सर्वांच्या प्रेमामुळे ते भारावून गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलकर्णी म्हणाले की, त्यांच्या डोळ्यांत अश्रू नसतील, पण त्यांच्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील निराशा आणि वेदना त्यांनी पाहिली आहे. ती वेदना त्यांच्या स्वतःच्या वेदनेपेक्षा मोठी आहे. “आणखी किती वेळा स्वतःच्या अपेक्षा बाजूला ठेवायच्या? आणखी किती वेळा ‘पुढच्या वेळी’ या आशेवर चालत राहायचे? आणखी किती वेळा निष्ठेची परीक्षा द्यायची?” असे भावनिक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

राजकारणात पद मिळाले नाही, तरी कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा मुकुट कोणत्याही पदापेक्षा मोठा असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. मात्र या मुकुटामागे दडलेली एका निष्ठावंत कार्यकर्त्याची वेदना, नाराजी आणि संघर्षाची कहाणी प्रथमच शब्दांत व्यक्त करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कुलकर्णी यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये उमेदवारीवाटप, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान, प्रवक्त्यांच्या योगदानाची दखल आणि स्थानिक नेतृत्वाच्या भावनांचा विचार या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वक्तव्यातील वेदना वैयक्तिक असली तरी तिचा राजकीय अर्थ व्यापक आहे. कारण हा प्रश्न एका व्यक्तीचा राहिलेला नाही; तो पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न बनू शकतो.

कुलकर्णी यांनी शेवटी आपल्या मनःस्थितीचे वर्णन कवितेच्या ओळींतून केले आहे —

“झिजलो पक्षासाठी, झेलल्या संघर्षाच्या झळा,
आशेच्या वाटेवर चाललो कित्येक वर्षे भला.
पद न मिळाले तरी निष्ठा कधी कमी झाली नाही,
पण मनातील वेदना सांगते, जखम अजून भरली नाही.”

काकासाहेब कुलकर्णी यांची ही खदखद काँग्रेस नेतृत्वापर्यंत केवळ नाराजी म्हणून पोहोचते की पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मानाबाबतचा गंभीर संदेश म्हणून घेतली जाते, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात