सोनमर्ग (जम्मू आणि काश्मीर) – ऑपरेशन विजयच्या २६व्या विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारगिल दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सोनमर्ग येथे ताफा थांबवून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
कारगिलच्या द्रासमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉन २०२५ या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी जात असताना, श्रीनगरहून द्रासकडे प्रवास करताना त्यांनी वाटेत उतरून काश्मीरमधील सद्यःस्थितीची माहिती घेतली.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रावर खोल परिणाम झाला होता. यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी स्थानिक दुकानदार, घोडेवाले, फळ विक्रेते आणि पर्यटक यांच्याशी संवाद साधत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
या संवादात, “आता परिस्थिती पूर्ववत होते आहे. पर्यटक पुन्हा काश्मीरमध्ये येऊ लागले आहेत,” असे मत स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
त्याचवेळी, येथे आलेल्या पर्यटकांनीही “आम्हाला आता कोणतीही भीती वाटत नाही. हे नंदनवन पाहताना आपण सुरक्षित आहोत, असेच वाटते,” असे म्हटले.
काश्मीरच्या थंडगार हवामानात स्थानिक कणीस विक्रेत्याकडून कणीस घेऊन शिंदे यांनीही त्या निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला.
पहलगाम हल्ल्यानंतर “स्थानिक लोकही दहशतवाद्यांना साथ देतात,” अशा प्रकारचा अपप्रचार मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्यक्ष दौरा करून स्थानिकांशी संवाद साधून विश्वासाची पाळेमुळे रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, हे विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
एका मोठ्या आणि प्रगत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घालून काश्मीरमध्ये असा संवाद साधणे हे निश्चितच कौतुकास्पद असून, येथील राजकीय वर्तुळातही त्याची चर्चा सुरू आहे.