महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील उमेदवारांवरील लाठीमाराचा मुद्दा विधानसभेत गाजला; वडेट्टीवारांचा सरकारवर आक्रमक हल्लाबोल

नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेत अकरा महिने पूर्ण केलेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या युवकांवर बेछुट लाठीमार झाल्याचा मुद्दा आज विधानसभेच्या विशेष बैठकीत तीव्रतेने गाजला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीच्या वेळी हा विषय अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला. या मुद्द्यावर अनेक ज्येष्ठ सदस्य उभे राहून शासनाकडून ठोस आणि स्पष्ट उत्तराची मागणी करत होते. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर देणे अपेक्षित असताना मंत्री शंभूराज देसाई यांनी शासनाची बाजू मांडल्याने विरोधी सदस्य अधिकच संतप्त झाले.

या विषयावर राहुल पाटील आणि अमित साटम यांच्या लक्षवेधीही पाठोपाठ होत्या. राहुल पाटील यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री लोढा यांनी, “या योजनेसाठी 418 कोटी 18 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून योजना सुरू राहील,” असे सांगितले.

यानंतर भाजप सदस्य अमित साटम यांची लक्षवेधी पुकारण्यात आली. “या प्रशिक्षणार्थींना रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी सरकार काय करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी या युवकांना सेवेत कायम न करणे म्हणजे सरकारचा विश्वासघात असल्याचा आरोप केला आणि त्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी केली. भाजप सदस्य योगेश सागर यांनीही हरकतीचा मुद्दा उपस्थित करत, “या मुलांवर अन्याय होऊ नये,” अशी भूमिका मांडली.

वडेट्टीवार यांनी संतप्त सुरात विचारले, “नोकरी मागणाऱ्या या मुलांवर बेछुट लाठीमार का केला? अनेकांना फ्रॅक्चर का झाले? शिंदे–फडणवीस सरकारने त्यांना सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार हरकत घेतली. त्यानंतर जयंत पाटील यांनी, “आम्ही संबंधित मंत्र्यांना प्रश्न विचारतो, मग दुसरे मंत्री उत्तर का देतात?” अशी हरकत नोंदवली.

विजय वडेट्टीवार यांनी हरकतीच्या मुद्द्यावरून सरकारने ठोस उत्तर द्यावे अशी मागणी लावून धरली. नाना पटोले, वडेट्टीवार, जयंत पाटील, राहुल पाटील, भास्कर जाधव यांच्यासह अनेक सदस्य उभे राहून या प्रशिक्षणार्थी युवकांना न्याय देण्याची मागणी करत होते.

अखेर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, “ही मूळ योजना कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी नव्हती, तर प्रशिक्षणासाठी होती.” तथापि, “या युवकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांच्यासाठी शासन विशेष योजना आणत असून सर्वांना त्याचा लाभ होईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात