महाड : महाराष्ट्रात सातबारा उतारा म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचं अधिकृत दस्तऐवज. मात्र, या नोंदीसाठी देखील लाच मागितली जाईल, हे कुणाच्या कल्पनेतही नसेल. अशाच प्रकारचा प्रकार महाड तालुक्यात उघडकीस आला आहे, जिथे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याने एका शेतकऱ्याकडून फक्त सातबाऱ्यावर खरेदीखताची नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली आणि ती घेताना रंगेहात अडकले.
प्रकरण असे आहे की, खर्डी (ता. महाड) येथील महादेव नारायण महाडिक यांनी वरंडोली येथे सर्वे नं. २९८ मधील ०.२२२० हेक्टर जमीन ११ फेब्रुवारी २०२५ रोजी खरेदी केली होती. त्यांनी ही जमीन सातबारा उताऱ्यावर नोंदवण्यासाठी तलाठी सुरज मोहनलाल पुरोहित (सजा – चापगाव) यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र, पुरोहित यांनी मंडळ अधिकारी भगवान तेजराव मोरे (सजा – मंगरूळ) यांच्या संगनमताने या नोंदीसाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली.
महाडिक यांनी ही बाब अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) कळवली. विभागाचे निरीक्षक एस. व्ही. भिसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३ एप्रिल रोजी सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले.
या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात डिजिटल सातबारा, भूमी अभिलेखांचे संगणकीकरण आणि महसूल व्यवहार पारदर्शक करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात असताना, स्थानिक पातळीवरील लाचखोरी अजूनही थांबताना दिसत नाही. ही घटना त्याचाच एक जिवंत उदाहरण आहे.
“सरकारने कितीही सुविधा ऑनलाइन दिल्या, तरी अधिकारी जर भ्रष्ट असतील, तर सामान्य माणसाला त्याचा उपयोग काय? आम्हाला जमिनीची नोंद करायला लाच द्यावी लागते, हे दुर्दैव आहे,” अशी भावना एका स्थानिक शेतकऱ्याने व्यक्त केली.