महाराष्ट्र ताज्या बातम्या

सीईटी परीक्षेत मोठा घोटाळा उघड – २२ लाखांची आर्थिक देवाणघेवाण; चौघे अटकेत

उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई – राज्यात सीईटी परीक्षेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून, एका पेपरमध्ये टक्केवारी वाढवून देण्यासाठी प्रत्येकी २२ लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, हे गुन्हेगार उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या परराज्यातील असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.

सीईटी कक्षामार्फत एमबीए, एमएमएस आणि अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित करण्यात आली होती. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्प डेस्कची सुविधा देखील देण्यात आली होती.

दरम्यान, दोन विद्यार्थ्यांना अनोळखी क्रमांकांवरून कॉल करून मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर राज्य सरकारने तत्काळ समिती नेमून चौकशीचे आदेश दिले. चौकशीदरम्यान अवैध आर्थिक व्यवहाराचे ठोस पुरावे हाती लागले असून, या रॅकेटचा जाळा देशभरात पसरल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

आरोपींनी विविध विद्यार्थ्यांना फोन करून टक्केवारी वाढवण्यासाठी २२ लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याचा अधिक तपास सुरू असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सीईटी परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. तसेच, अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करत, सीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आणि भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी सीईटी कक्षाला योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात