मुंबई : पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील ५९७ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांना पैसे परत करण्यात येतील, अशी घोषणा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.
भाजप आमदार पराग शाह यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला असता, भाजपचे सदस्य प्रशांत ठाकूर यांनीही चर्चेत सहभाग घेतला. उत्तर देताना सहकारमंत्री पाटील म्हणाले, या प्रकरणात अनेक चौकशा झाल्या असून, दोषी संचालकांच्या ९७ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप बँकेचा परवाना रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
या बँकेचे ५८,२०४ खातेदार असून, त्यांच्या एकूण ८६ कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेण अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केल्यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळत नाहीत.
बँक अवसायनात काढण्याच्या प्रस्तावावर मतभेद असल्याने अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. काही लोकांचा त्यास विरोध असून, काही जणांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.