मुंबई
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील येत्या २० जानेवारी रोजी मुंबई दाखल होणार आहेत. मुंबईत येऊन ते उपोषण करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानात दाखल होणार आहेत.
दरम्यान त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील मराठ्यांचं आंदोलन यशस्वी होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आंदोलन करून नये यासाठी ही याचिका दाखल केली आहे. हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाने आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. दोन्ही समाज समोरासमोर आल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जरांगे पाटील यांनी २ कोटी मराठा बांधवांसोबत मुंबईला येणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. यापैकी १ कोटी मराठा बांधव मुंबईत आले तरी मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मुंबईच्या गतीमानतेवर याचा परिणाम होईल. त्याशिवाय मुंबईकरांनाही याचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर उच्च न्यायालयाने योग्य निर्णय द्यावा, असं हेमंत पाटील यांनी जनहित याचिकेत म्हटलं आहे.