लेख ताज्या बातम्या

फडणवीसांमुळे मराठवाड्याची भरभराट!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून ओळखले जातात. मराठवाड्यात बहुप्रतिक्षित वॉटर ग्रीड प्रकल्प तसेच नवनवीन उद्योग याबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे आग्रही आहेत. मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने तीन मोठे प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे उभारले जाणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यात उद्योगाला चांगलीच भरभराट येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत याबाबतच्या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.

मराठवाड्याची पाणीटंचाई दूर होण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रिडला लवकरच परवानगी मिळेल, असा विश्वास पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केला. मराठवाड्यातील पुढाऱ्यांचा रेटा कमी परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी अधिकचा पुढाकार आहे. सत्ताधारी पक्षाच्या २९३ अन्वये झालेल्या चर्चेत पाणीपुरवठा विभागाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांना मंत्री गुलाबराव पाटील उत्तर देत होते. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाची किंमत ३४ हजार १९० कोटी रुपये अपेक्षित असल्याचे पाटील यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांतून पाइपलाइनद्वारे शहर आणि गावांना पाणी देण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिड ही योजना आखण्यात आली आहे.

या योजनेचा प्राथमिक संकीर्ण अहवाल आणि करारनामा २०१८ साली इस्रायलच्या कंपनीसोबत करण्यात आला आहे. या कंपनीने १० सविस्तर अभ्यास अहवालांपैकी आठ अहवाल दिले आहेत. त्यांपैकी पाच अहवालांना शासनाने मान्यता दिली आहे. मराठवाडा वॉटर ग्रिडचा भाग असलेल्या ४,४४८ कोटी इतक्या किमतीच्या ११ प्रादेशिक योजना जलजीवन मिशनअंतर्गत सुरू केल्या आहेत. त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून १,४८७ गावांत या माध्यमातून कामे प्रगतिपथावर आहेत. ही मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत समाधानकारक बाब मानली जात आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांच्या स्तरावर एप्रिल २०२३ मध्ये आठ जिल्ह्यांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यास केंद्र सरकारला विनंती केली होती. त्याचबरोबर ऑक्टोबर २०२३ मध्ये राष्ट्रीय जलजीवन मिशनअंतर्गत मराठवाडा वॉटर ग्रिडला आठ जिल्ह्यांसाठी २९ हजार कोटींच्या प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती केली आहे. हा प्रकल्प वर्ल्ड बँक, आशियाई बँकांमार्फत कर्ज उभारून करावा, अशी सूचना केंद्राने केली आहे. त्यानुसार जागतिक बँकेशी संपर्क साधून पाठपुरावा केला जात आहे. तसेच इस्रायलच्या कंपनीला उर्वरित अहवाल सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत दिली आहे. एकंदरीत पाहता मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने जी काही प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः याकडे लक्ष देऊन आहेत.

मराठवाड्याला उद्योगाचे बळ देण्याच्या दृष्टीने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय झाला. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ अशी मराठीत म्हण आहे. याचा अर्थ बोलल्याप्रमाणे जो चालतो त्याची वंदावी पाऊले म्हणजेच त्यांना वंदन करावे. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत विदर्भ व मराठवाड्याला मोठे उद्योग मिळतील, या दृष्टीने 17 करारांना मूर्तस्वरुप देण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार व जागतिक आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्यानंतर दौऱ्याचे फलित काय असे म्हणून विरोधकांनी टिकेचा भडीमार केला होता. दावोस येथे जगभरातील मोठमोठ्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी भारतातील अनेक मोठमोठ्या कंपन्या देखील उपस्थित होत्या. त्या बैठकीचे फलीत लवकर दिसणारे नव्हते. देशभरातील प्रमुख कंपन्या तसेच इतरही राज्यांचे मुख्यमंत्री व इच्छूक उद्योजक करार करण्यासाठी धडपड करत होते. दावोस येथे भरणार्‍या व्यापार्‍यांच्या, मोठमोठ्या कंपन्याच्या परिषदेला जगभरातील प्रतिनिधी हजर असतात. यापूर्वीही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील नेते दावोस येथे अशा परिषदेला उपस्थित होते. परंतु केवळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याकारणाने त्यांच्यावर टिका करून दावोस येथून मुख्यमंत्र्यांनी काय आणले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या प्रश्नाचे उत्तर विरोधकांना आता मिळाल्यात जमा आहे.

मराठवाड्यावर असलेला मागासलेपणाचा कलंक पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मराठवाड्याला उद्योगाचे बळ मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ‘ईव्हीकार’ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मराठवाड्यात तीन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे 12 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. यासाठी 28 हजार 898 कोटींची गुंतवणूक मराठवाड्यात होणार आहे. टोयाटो, जेएसडब्लू, एथर या पाठोपाठ रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चर आणि जेनसोल इंजिनियअरिंग कंपनी इलेक्ट्रीक वाहने (ईव्ही) निर्मितीचे प्रकल्प छत्रपती संभाजीनगरात सुरू करणार आहेत. याशिवाय अवणी पॉवर इंडस्ट्रीज लिथीयम बॅटरी निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. या तिन्ही प्रकल्पाची लॉटरी मराठवाड्याला लागली आहे.

दावोस येथे 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी 51 सामंजस्य करार झाले होते. त्यापैकी 17 करारांना मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. हे पूर्ण 17 प्रकल्प विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचे हब बनत आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने खूप मोठा हातभार लाभत आहे. केवळ टिका म्हणून दावोस दौर्‍यावर नवतरूण आमदारांनी तोंडसुख घेतले होते. आदित्य ठाकरे हे वडिलांच्या मंत्रीमंडळात असताना दावोस दौर्‍यावर गेले होते. त्या ठिकाणी जगभरातील मोठमोठे उद्योजक जमले होते. त्यानंतर त्यांनी मराठवाड्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी कोणते मोठे उद्योग आणले हे त्यांनाच विचारण्याची वेळ आली आहे.

भारतातील अनेक उद्योजकांची त्या ठिकाणी उपस्थिती होती. दरवर्षी भारतातील अनेक कंपन्या त्या ठिकाणी सहभागी होतात. केवळ भारतातीलच नव्हे संपूर्ण जगभरातील कंपन्या त्या ठिकाणी एकत्र जमतात व त्यांना सोयीच्या असणार्‍या देशासोबत करार करून मोठमोठ्या प्रकल्पांना मंजुरी घेतात. हा दावोस बैठकीचा एक भाग आहे. असे असताना आदित्य ठाकरे, रोहित पवार यांनी केवळ टिका म्हणून फडणवीस यांच्या दावोस दैार्‍यावर आग ओकली होती. आता मराठवाड्याला मिळणार्‍या या नवीन प्रकल्पांमुळे टिका करणार्‍यांना उत्तर या उद्योगांच्या रुपाने मिळणार आहे.

आता मराठवाड्याचा भविष्यात मोठा विकास होणार आहे. मोठमोठे उद्योग छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने सुरू होणार आहेत. ‘ईव्हीकार’ प्रकल्प भविष्यात मोठी उभारी घेणार आहेत. त्यामुळे मराठवाड्याला नक्कीच अच्छे दिन येणार आहेत. यासाठी मराठवाड्यात 500 एकर जागा लागणार असून यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. ज्येष्ठ उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला प्रकल्प उभारण्यासाठी शासन देखील मदत करणार आहे. यामुळे मराठवाड्याच्या औद्योगिक वाढीला नवी दिशा मिळणार असून मराठवाड्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी निर्माण हेाणार आहेत.

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प व ईव्ही कार प्रकल्पामुळे या भागाचा कायापालट व भरभराट लवकरच पाहायला मिळणार आहे. यासाठी मात्र संपूर्ण मराठवाडावासीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नक्कीच ऋणी असतील.

(लेखक डॉ. अभयकुमार दांडगे हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Dr Abhaykumar Dandage

Dr Abhaykumar Dandage

About Author

डॉ अभयकुमार दांडगे (Dr Abhaykumar Dandage) हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार असून मराठवाडा हा त्यांचा लेखनाचा विषय आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज