मुंबईत तीन दिवस कार्यक्रम; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती
मुंबई – संयुक्त महाराष्ट्राच्या ६५व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘महाराष्ट्र महोत्सव’ साजरा केला जाणार आहे. मे महिन्यात विविध भागांत कार्यक्रम आयोजित केले जातील. मुंबईत तीन दिवसांचे आयोजन झाल्यानंतर विदर्भातील वर्धा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर पुणे व नाशिक येथे कार्यक्रम होतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
१०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव, संतपरंपरेचा जागर, तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचा आढावा या महोत्सवात घेतला जाणार आहे.
या नियोजनासाठी प्रदेश कार्यालयात बैठक झाली. त्याला कोकण, मुंबई, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री नरहरी झिरवाळ, इंद्रनील नाईक, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे, आमदार शिवाजीराव गर्जे, प्रतापराव चिखलीकर, विक्रम काळे, किरण लहामटे यांच्यासह अन्य पदाधिकारी बैठकीला हजर होते.