क्लोजर रिपोर्टबाबत मुंबई पोलिसांनी सत्य समोर आणावे
मुंबई : दिशा सालियनची हत्या झाली, आणि आता उबाठा गट तिच्या वडिलांचे चारित्र्यहनन करत आहे, अशी तीव्र टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. दिशा सालियन हत्येच्या क्लोजर रिपोर्टबाबत मुंबई पोलिसांनी सत्य जनतेसमोर मांडावे, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निरुपम म्हणाले की, “दिशा सालियनची हत्या जेव्हा झाली, तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दबावामुळे मालवणी पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला का?” असा संशय त्यांनी व्यक्त केला. “क्लोजर रिपोर्टमध्ये खोट्या गोष्टींचा समावेश करून दिशाच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि त्यांचे सहकारी आरोपी आहेत. दिशाची हत्या करूनच थांबले नाहीत, तर आता तिच्या वडिलांचे चारित्र्यहनन करण्याचे काम उबाठा गट करत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
निरुपम पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने एकदा नाही, तर दोनदा खरी शिवसेना कोणती हे स्पष्ट केले आहे. “उद्धव ठाकरे यांच्याकडे आता शिवसेना नाही, तर केवळ शिल्लक सेना आहे. विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाने ९५ जागांवर निवडणूक लढवली, पण त्यांना केवळ २० जागांवर यश मिळाले. त्याउलट, शिवसेनेने ८७ जागांवर निवडणूक लढवली आणि ५७ जागांवर विजय मिळवला. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेचे एकूण ६० आमदार आहेत.”
“शिवसेनेचा स्ट्राईक रेट ७०.३७ टक्के असून, पक्षाला ७९,९६,९३० मते मिळाली. तुलनेत उबाठाचा स्ट्राईक रेट फक्त २१.०५ टक्के राहिला आणि त्यांना ६४,३३,५६६ मते मिळाली. याचा अर्थ, शिवसेनेला उबाठा गटाच्या तुलनेत १५ लाख जास्त मते मिळाली,” असे निरुपम यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “शिवसेना आणि उबाठा गट यांच्यात ५२ जागांवर थेट लढत होती. त्यातील ३७ जागांवर शिवसेना विजयी ठरली, तर उबाठा गट फक्त १५ जागांवर जिंकू शकला. त्यातील सहा जागा मुंबईतील असून, त्या मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत.”
लोकसभेतही शिवसेनेचा प्रभाव
लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना निरुपम म्हणाले की, “शिवसेनेने १५ जागांवर निवडणूक लढवली आणि ७ खासदार निवडून आले. त्यांचा स्ट्राईक रेट ४६.३० टक्के होता. उबाठा गटाने २१ जागांवर उमेदवार उभे केले, पण त्यांना केवळ ९ जागांवर यश मिळाले. त्यांचा स्ट्राईक रेट ४२.८५ टक्के राहिला.”
“निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे की, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. पण उबाठा गटाचा जन्म जून २०२२ मध्ये झाला. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा वारसा सांगण्याचा अधिकार नाही. हा केवळ एक फुटलेला गट आहे,” असे सांगत निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.