पुणे
पुणे येथे ‘निर्भय बनो’ असे जनतेला आवाहन करणाऱ्या सभेला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी नियोजन करून जीवघेणा हल्ला केला. या फॅसिस्ट हिंस्र हल्ल्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र निषेध करत आहे.
भाजपच्या पुण्यातील नेत्यांनी संविधानाचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्राचे प्रशासन आणि पोलीस खात्याला उघड उघड आव्हान दिले होते. लोकशाही अधिकार बजावणाऱ्या नागरिकांना निर्भयतेने आपले कर्तव्य पार पाडण्यास संविधानाचे कवच पुरवले पाहिजे. या बाबतीत प्रशासन आणि पोलीस खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनी केवळ कामचुकारपणा केलेला नाही तर या खुनी हल्ल्यास आपल्या वर्तनाने सहाय्य केले आहे. या तिघांवर ठिकठिकाणी हल्ले करायचे नियोजन भाजपच्या गुंडांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाबतीत पोलिसांची भूमिका उघडपणे पक्षपाती होती, हेही दिसून आले आहे.
राज्यातील जनतेला निर्भयपणे आपले लोकशाही व्यवहार पाळता यावेत, याची अंतिम जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे. ती जबाबदारी पार पाडायच्या ऐवजी गाडीखालील श्वानाचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांची पाठराखण केली आहे. राज्यातील गोळीबारांच्या घटनांच्या पाठोपाठ पुण्यातील हल्ला हे राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः कोलमडल्याचे लक्षण तर आहेच; परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या भाजपच्या आशीर्वादाने होत आहे, असा धक्कादायक आरोप माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष खालील मागण्या करत आहे:
१. खुनाचा आणि सामाजिक अशांतता पसरवण्याचा कट करून तो अंमलात आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक केली पाहिजे.
२. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि गुन्हेगारांना साथ देणाऱ्या पुण्यातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.
३. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे.
सर्वसामान्य जनतेने आता निर्भय बनून या फॅसिस्ट गुंडगिरीला संविधानिक मार्गाने ठाम प्रत्युत्तर देण्यास सिद्ध झाले पाहिजे.