महाराष्ट्र

आता एकच लक्ष….. मिशन ४८

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने फुंकले प्रचाराचे रणशिंग…!

X: @NalavadeAnant

मुंबई: राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन ४८ ची सुरूवात करण्यासाठी राज्यभर शिवसंकल्प अभियान हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज वर्षा निवासस्थानी व्हिसीद्वारे पार पडली. या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाइन जोडले गेले होते. यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिले.

हे प्रचारमेळावे दोन टप्प्यात पार पडणार असून त्यातील पहिला टप्पा ६ जानेवारी रोजी यवतमाळ येथून सुरू होईल. ११ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचारदौरा पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहिर केले. दुसऱ्या टप्प्यात २५ जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्याना सुरूवात होणार असून २५ जानेवारीला शिर्डी येथे पहिला प्रचार मेळावा पार पडेल, तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप ३० जानेवारीला हातकणंगले येथे होईल.

या प्रचार मेळाव्यांच्या समारोपासह पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे दोन दिवसीय विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. त्याचप्रमाणे महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे होणार असून त्याच्या तारखाही लवकरच निश्चित करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या शिवसंकल्प अभियानाची तयारी करण्यासाठी एक मध्यवर्ती समिती तयार करण्यात आली असून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बरोबरीने या प्रचार मेळाव्यांची तयारी करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असेही निर्देश राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
त्याचवेळी महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना केले. शिवसंकल्प अभियानाप्रमाणेच महायुतीच्या एकत्रित सभाही राज्यभरात आयोजित करण्यात येतील. शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी शिवसंकल्प अभियान यशस्वी करण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारचे काम घराघरात पोहचवण्याचा निर्धार

राज्यातील वातावरण सध्या महायुतीला सकारात्मक असून प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करणारे सरकार अशी आपल्या सरकारची जनमानसात ओळख झाल्याने सरकारने केलेली चांगली कामे लोकांपर्यंत पोहचवून आपल्याला मते मागायची असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत सांगितले.

‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत २ कोटी ७४ लाख लोकांना प्रत्त्यक्ष लाभ मिळवून देण्यात आल्याचे तसेच एसटीमध्ये महिलांना ५० टक्के दिलेली सवलत, महात्मा फुले आरोग्यदायी योजनेची मर्यादा दीड लाखांवरून ५ लााखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय, शेतकऱ्यांच्या बाबतीत १ रूपयात पीक विमा काढून त्यातील अडीच हजार कोटींचे अग्रीम वाटप करण्याचा निर्णय असो आदी विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असेही निर्देश त्यांनी पक्ष नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.

२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात राम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. हा क्षण कायम लक्षात रहावा यासाठी घराबाहेर भगवा झेंडा लावावा, गुढ्या उभाराव्यात, जागोजागी दीपोत्सव साजरा करण्यात यावा असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. राम मंदिराची उभारणी हे स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि करोडो राम भक्तांचे स्वप्न होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे.

अयोध्येतील राम मंदिर हा आपल्यासाठी आस्थेचा विषय असून हा क्षण कायम लक्षात रहावा यासाठी शक्य तिथे हा सोहळा एलईडी स्क्रिनच्या माध्यमातून लोकांना लाईव्ह दाखवण्याची सोय उपलब्ध करून द्यावी असेही यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तसेच आपापल्या भागातील मंदिरे, ग्रामदेवतांची मंदिरे येथे विद्युत रोषणाई करून हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असे निर्देश शिवसेनेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत देण्यात आले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात