By योगेश त्रिवेदी
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केलेली शिवसेना नारायण राणे, छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांना कधीच समजली नाही. सत्तेच्या आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी शिवसेना सोडली, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी केला.
कांदिवली येथील ठाकूर संकुलातील कमांडर दत्ताजी साळवी मार्गावर शिवसेना शाखा १४ च्या उपशाखा संस्कृतीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शाखा क्रमांक १४ च्या शाखाप्रमुखपदाचा राजीनामा दिलेल्या अशोक परब यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांच्या जागी उपशाखा प्रमुख अभिलाष कोंडविलकर यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, माजी आमदार विलास पोतनीस, शुभदा शिंदे, चेतन कदम, नंदकुमार मोरे, अभिलाष कोंडविलकर, रेखा बोऱ्हाडे, रोहिणी चौगुले, शशिकांत झोरे, संजय जोजन, भाविका नवलू, वसंत तांबे, तुकाराम जोशी, अशोक म्हामूणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना घोसाळकर आणि नेरुरकर यांनी “शिवसेना ही एक कुटुंब आहे. कोणतेही पद महत्त्वाचे नाही, तर शिवसैनिक म्हणून काम करण्याची भावना महत्त्वाची आहे,” असे सांगत माजी पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचा सल्ला दिला.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी म्हणाले, “पदावर असताना अनेक सत्कार होतात, पण पदावरून उतरल्यावर सत्कार होणे, हे त्या व्यक्तीच्या कार्याची खरी पावती असते.” आयोजक शाम साळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशोक परब यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली, असेही त्यांनी नमूद केले.