मुंबई – कुर्ला तहसील कार्यालयातील दलालांची मनमानी, सामान्य नागरिकांची अडवणूक आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदार श्री. दिलीप रायनावार यांना घेराव घालण्यात आला. हे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले आणि मुंबई जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
तहसील कार्यालयात अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वारस तपास यांसारख्या आवश्यक कागदपत्रांसाठी नागरिकांना महिनोनमहिने हेलपाटे मारावे लागतात. मात्र, दलालांकडून हीच कामे दोन दिवसांत पूर्ण होतात. हे नेमके कसे? असा थेट सवाल अॅड. अमोल मातेले यांनी उपस्थित केला.
“अवघ्या ४० रुपयांत मिळणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी अर्जदारांना जाणूनबुजून त्रुटी काढून त्रास दिला जातो. ‘नेटवर्क नाही’, ‘वीज नाही’, ‘वरिष्ठांचे आदेश’ अशा सबबी सांगत सामान्य नागरिकांना परत पाठवले जाते. पण दलालांना मात्र कोणतीही अडचण येत नाही. हे सर्व प्रकार प्रशासनाच्या संगनमताशिवाय शक्यच नाहीत,” असे ठणकावत त्यांनी तहसील प्रशासनावर थेट आरोप केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रमुख मागण्या:
1️⃣ तहसील कार्यालयातील सर्व दलालांवर तात्काळ बंदी आणावी.
2️⃣ अधिवास, उत्पन्न, वारस तपास प्रमाणपत्रांसाठी १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत.
3️⃣ कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
4️⃣ दलालांच्या गैरप्रकारांवर विशेष मोहीम हाती घ्यावी.
“तहसीलदार कार्यालयाने तातडीने योग्य ती पावले उचलली नाहीत, तर वरिष्ठ प्रशासनाकडे दाद मागितली जाईल तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र केले जाईल,” असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला.