महाराष्ट्र ताज्या बातम्या

दंगल भडकवणाऱ्या नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी फिरवणार? : हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

मुंबई : हास्यकलाकार कुणाल कामराने आपल्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही, तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःवर टीका असल्याचे गृहित धरून तोडफोड केली. हल्ला करणारे सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मग त्यांचा सरकार, संविधान, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का? त्यांना कायदा हातात का घ्यावा वाटला? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले, “कुणाल कामराचा कार्यक्रम ज्या स्टुडिओत झाला, तो त्याचा वैयक्तिक स्टुडिओ नव्हता. त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. भाजप नेते आशिष शेलार यांच्या सत्काराचा कार्यक्रमही तिथेच झाला होता. हा स्टुडिओ एका स्वातंत्र्यसैनिकाचा आहे, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत विवाह केला नव्हता. स्वातंत्र्यानंतर त्यांनी लग्न केले. हा स्टुडिओ नफेखोरी न करता कलाकारांसाठी उपलब्ध करून दिला जातो. त्या सांस्कृतिक केंद्रावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला म्हणजे एका स्वातंत्र्यसैनिकाच्या संपत्तीवर हल्ला आहे.”

“हा प्रश्न केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नाही, तर लोकशाही व्यवस्थेत लोकांनी कसे जगावे याचाही आहे. या तोडफोडीत स्टुडिओचे २५ लाखांचे नुकसान झाले असून, सरकारने त्याची भरपाई द्यावी. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, हे अतिशय गंभीर आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दंगलीतील आरोपींकडून नुकसानभरपाई वसूल करण्याचे जाहीर केले होते. त्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केला, “नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानच्या घरावर सरकारने बुलडोझर चालवला, मग दंगलीला चिथावणी देणाऱ्या भाजप मंत्री नितेश राणेंच्या घरावर कधी चालवणार?”

“नितेश राणे यांनी चिथावणीखोर, भडकाऊ विधाने केली आहेत. त्यामुळे फडणवीस सरकार आता त्यांच्या घरावरही बुलडोझर चालवणार का?” असा थेट सवालही सपकाळ यांनी केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात