मुंबई
केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या वर्षांच्या गणित बिघडलं असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचे एक हजारहून अधिक विवाह होऊ शकलेले नाहीत. अर्थकारण कोलमडल्यामुळे विवाहाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याशिवाय राज्यातील तब्बल २ हजार ५०० ते ३ हजार विवाह सोहळ्याच्या तारखा काढून पैशांअभावी पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. केंद्राचा निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत असल्याचे किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.
७ डिसेंबर रोजी केंद्राने कांदा निर्यातीवर बंदी आणली. निर्यातबंदी लावण्यात आली तेव्हा कांद्याला ३ हजार ८०० ते ४ हजार प्रति क्विंटल भाव होता. आज तोच भाव १ हजार ७०० ते २ हजारांपर्यंत खाली घसरला आहे. यामुळे महिन्याला तब्बल हजार कोटींचं नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे.