मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता १०० रुपयांऐवजी १,००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. वायू प्रदूषण आणि आरोग्यधोके लक्षात घेता, महानगरपालिकेने दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.
महानगरपालिकेच्या प्रत्येक विभाग (वॉर्ड) स्तरावर यासाठी विशेष पथके गठीत करण्यात येणार असून, या पथकात घन कचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक, उपद्रव शोधक (एनडी स्टाफ) आणि मुकादम यांचा समावेश असेल. हे पथक कचरा जाळण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवून तात्काळ कारवाई करणार आहे.
सध्या बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ अंतर्गत नियम ५.१० नुसार १०० रुपयांचा दंड आकारला जातो. मात्र, दंडाची रक्कम कमी असल्याने अंमलबजावणी प्रभावी ठरत नव्हती. अनेक ठिकाणी, विशेषतः उघड्या भूखंडांवर, बांधकाम स्थळांवर आणि रस्त्याच्या कडेला कचरा जाळल्याचे प्रकार आढळतात. त्यामुळे महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
उघड्यावर कचरा जाळल्याने हवा दूषित होते, श्वसनाचे आजार बळावतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचते. त्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवण्यासाठी महानगरपालिका विशेष मोहिम राबवणार आहे, अशी माहिती उपआयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिली.
महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने उघड्यावर कचरा जाळू नये. अन्यथा १ हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात येईल.