मुंबई : विद्याविहार पश्चिम येथील निळकंठ किंग्डम कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या भीषण आगीत सुरक्षारक्षक उदय गांगण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (एन विभाग) उपायुक्तांची भेट घेऊन जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या संपूर्ण प्रकरणावर त्वरित कारवाई करण्यासाठी ॲड. मातेले यांनी पुढील मागण्या केल्या: संपूर्ण अग्निसुरक्षा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल तातडीने प्रसिद्ध करावा. अनधिकृत फेरबदल करणाऱ्या विकासक, व्यवस्थापक, मालक आणि गाळेधारकांवर कायदेशीर कारवाई करून अनधिकृत बांधकाम निष्कासित करावे. सुरक्षारक्षकाच्या मृत्यूस जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. मृत सुरक्षारक्षकाच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करावा. निळकंठ बिजनेस पार्कमधील सर्व अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करावी.
भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही ॲड. मातेले यांनी दिला.
या वेळी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर, तालुकाध्यक्ष अन्वर भाई दळवी, सरचिटणीस राहुल टिकेकर, युवक कार्याध्यक्ष अक्षय खिल्लारी आणि युवक मुंबई सरचिटणीस इमरान तडवी उपस्थित होते.