मुंबई — काँग्रेस पक्षाला भारत निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या सर्व शंका व मुद्द्यांवर सविस्तर आणि तपशीलवार उत्तर दिले होते. मात्र, या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका उपस्थित केल्याने आयोगाने खेद व्यक्त केला आहे.
“निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा त्याच्या प्रतिनिधींनी थेट पत्राद्वारे आमच्याशी संपर्क साधल्यास, आम्ही त्याला उत्तर देत आलो आहोत आणि देत राहू,” असे आयोगाने स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी वारंवार माध्यमांद्वारे आयोगावर आरोप केल्याबाबत आश्चर्य आणि खेद व्यक्त करत, अशा संवादासाठी माध्यमांऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करावा, अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे.
“आमच्याकडे विचारलेल्या अधिकृत प्रश्नांना उत्तर देण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक, ठोस आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे,” असे आयोगाने ठामपणे सांगितले.
लोकशाही प्रक्रियेस अधिक बळकटी देण्यासाठी आणि संवाद अधिक परिणामकारक ठरण्यासाठी माध्यमांमधील वक्तव्यांपेक्षा थेट पत्रव्यवहार अधिक योग्य ठरेल, असेही आयोगाने नमूद केले आहे.