पालघर : अजमेर-बांद्रा ट्रेन गुजरातकडे जात असताना पालघर रेल्वे स्थानकावर एक आणि दोन नंबर ट्रॅक ओलांडत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुटली. या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून स्थानक परिसरात सायरनचा आवाज सातत्याने ऐकू येत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र रेल्वे गाड्या खोळंबल्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या विनंतीवरून सुवर्णदुर्ग शिपिंग अॅण्ड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी विशेष सेवा उपलब्ध करून दिली आहे. ट्रेन बंद असल्यामुळे अडकलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आज शेवटची फेरी बोट जी नेहमी १०:१० वाजता असते, ती वाढवून रात्री १२:०० वाजेपर्यंत सेवा देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.