X: @vivekbhavsar
ग्वादर—पाकिस्तानच्या नैऋत्य किनाऱ्यावर वसलेले, एकेकाळी शांत असलेले हे मासेमारीचे गाव—आज देशाच्या मोठ्या आर्थिक स्वप्नांचे केंद्र बनले आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग (CPEC) अंतर्गत येथे बंदर विकसित केले जात आहे, ज्यामुळे ग्वादर प्रगतीचे प्रतीक झाले आहे. पण या विकासाच्या नावाखाली , इथे पिढ्यानपिढ्या समुद्रावर अवलंबून असणारा मच्छीमार समाज आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतो आहे.
ग्वादरच्या मच्छीमारांची उपजीविका अनेक पिढ्यांपासून अरबी समुद्रावर अवलंबून आहे. साध्या लाकडी होड्या, जाळी आणि पारंपरिक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी आपले व्यवसाय टिकवून ठेवले. पण आता मोठ्या व्यावसायिक ट्रॉलर, औद्योगिकीकरण, आणि बंदरविकासामुळे त्यांचे संपूर्ण जीवनमान बदलत आहे.

“पूर्वी आम्ही समुद्रात जाऊन पुरेसा मासे पकडून आणायचो—घरच्यांसाठी आणि बाजारात विक्रीसाठी. पण आता मोठ्या ट्रॉलर येऊ लागल्यामुळे आमच्या जाळ्यात काहीच अडकत नाही,” असं हाजी बलोच सांगतात. यांचे कुटुंब चार पिढ्यांपासून या व्यवसायात आहे.
अनेकदा परदेशी कंपन्यांच्या मालकीचे असलेले मोठे व्यावसायिक ट्रॉलर अत्याधुनिक साधनसामग्री वापरून मासेमारी करतात. यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या वाट्याला काहीच उरत नाही. त्याचबरोबर खोल समुद्रात होणाऱ्या या मोठ्या प्रमाणावरील मासेमारीमुळे स्थानिक आणि व्यावसायिक मच्छीमारांमध्ये संघर्ष वाढताना दिसतो आहे.
CPEC अंतर्गत विकसित होणाऱ्या ग्वादर पोर्टमुळे आर्थिक प्रगती आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा सरकारचा दावा आहे. पण स्थानिक मच्छीमारांसाठी मात्र हा प्रकल्प अनिश्चिततेचा काळ घेऊन आला आहे. मच्छीमारांच्या पारंपरिक व्यवसायावर परिणाम होत आहे, अनेक जुनी मासेमारीच्या गोद्या विस्थापित झाल्या आहेत, समुद्रात जाण्यासाठीचे मार्ग बंद झाले आहेत, आणि बंदराच्या प्रदूषणामुळे समुद्री जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.
सर्वात मोठी अडचण म्हणजे ईस्टबे एक्स्प्रेसवे या महामार्गाची निर्मिती, ज्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठीच्या पारंपरिक मार्गांवर मर्यादा आल्या आहेत. सरकारने नवीन मासेमारी क्षेत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असले तरी स्थानिक लोक अजूनही साशंक आहेत.
“आम्हाला सांगण्यात आलं होतं की हा विकास आमच्यासाठी समृद्धी घेऊन येईल, पण प्रत्यक्षात आम्हाला आमच्या उपजीविकेवर संकटच दिसत आहे,” असं रशीद मेंगल या स्थानिक मच्छीमाराचं मत आहे.

या संकटांवर मात करण्यासाठी ग्वादरच्या मच्छीमारांनी आता संघर्षाचा मार्ग अवलंबला आहे. त्यांनी सरकारकडे आपल्या हक्कांसाठी मागण्या मांडण्यास सुरुवात केली आहे, आंदोलनं केली जात आहेत, आणि मोठ्या मासेमारी कंपन्यांवर निर्बंध घालण्याची मागणी केली जात आहे.
काही मच्छीमार बदल स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी इंजिन असलेल्या आधुनिक होड्या आणि नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. पण योग्य आर्थिक मदतीशिवाय त्यांची परिस्थिती फारशी सुधारू शकत नाही.
“आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे अमर्याद संसाधने आहेत,” असं मेंगल म्हणतो.
तज्ज्ञांच्या मते शाश्वत मासेमारी धोरणं, लहान मच्छीमारांसाठी आर्थिक मदत, आणि पोर्ट क्षेत्रात त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.
याशिवाय इको-टुरिझम आणि टिकाऊ सीफूड उद्योगाचंही महत्व वाढत आहे. जर हे योग्य प्रकारे व्यवस्थापित केले, तर ग्वादरच्या मच्छीमारांना पर्यायी रोजगार मिळू शकतो आणि त्यांची समुद्राशी असलेली नाळ तुटणार नाही.
ग्वादरच्या मच्छीमारांची कहाणी संघर्ष, परंपरा आणि टिकून राहण्याच्या जिद्दीची आहे. औद्योगिकीकरणामुळे नक्कीच संधी वाढतील, पण त्या स्थानिक समुदायांच्या विनाशाच्या किंमतीवर मिळणार असतील, तर त्याचा विचार करायला हवा.
पाकिस्तान सरकारला आता ठरवावं लागेल—विकास स्थानिकांना विस्थापित करून होणार की त्यांच्या भविष्याचा विचार करून?
सध्या तरी, अरबी समुद्राच्या लाटांवर ग्वादरचे मच्छीमार आपली होडी हाकत आहेत—भविष्यात काय वाढून ठेवलंय याची त्यांना कल्पना नाही, पण ते आपली परंपरा सोडायला तयार नाहीत.
(मूळ इंग्रजी लेखाचा स्वैर मराठी अनुवाद)