महाराष्ट्र ताज्या बातम्या

पोलिसाचा ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त… तपास अधिक गंभीर वळणावर

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात एका पोलीस कर्मचाऱ्याने उभारलेल्या ड्रग्ज उत्पादनाच्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. डीआरआय (महसूल गुप्तचर संचालनालय) च्या विशेष पथकाने या कारवाईत ११ किलो ३६० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केला असून, याची अंदाजित बाजारभाव किंमत १७ कोटी रुपये आहे. या घटनेनंतर मराठवाड्यात प्रचंड खळबळ माजली आहे.

रोहिणा गावाजवळ एका दुर्गम शेतात पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू होता. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील डीआरआयच्या ३५ अधिकाऱ्यांच्या पथकाने सात दिवस गुप्त तपास करून ही कारवाई केली. प्रमोद केंद्रे (३५), मूळचा रोहिणा गावचा व सध्या मीरा-भाईंदर (मुंबई) येथे पोलीस खात्यात कार्यरत, यानेच हा कारखाना उभारल्याचे निष्पन्न झाले. तो मुंबईहून ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणून, गावात बनवलेले अमली पदार्थ पुन्हा मुंबई व इतरत्र वितरित करत होता.

कारवाईदरम्यान शेडमध्ये ड्रग्ज बनवण्याचे साहित्य, कच्चा माल, आणि प्रयोगशाळेतील उपकरणेही जप्त करण्यात आली. या प्रकरणात सात जणांना अटक झाली असून त्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मुंबईतील वितरक आणि आर्थिक पुरवठादारालाही अटक झाली आहे. आरोपींमध्ये ड्रग्जचे उत्पादन, वितरण व आर्थिक व्यवहार यांची विभागणी केली गेली होती.

आरोपी आहाद मेमन याने पोलिसांना चकवा देण्यासाठी तपासकर्त्यांच्या गाडीतून पळण्याचा प्रयत्न केला. त्याने वाहनाचे स्टेअरिंग उलट वळवून गाडी एका हॉटेलच्या फलकावर आदळली. यामध्ये सहा लाखांचे नुकसान झाले असून काही अधिकारी किरकोळ जखमी झाले. यासंदर्भात चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांची चौकशी?

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करताना, काही पुजाऱ्यांवर संशयाची सुई फिरली आहे. पोलिसांनी सुमारे १२ ते १३ पुजाऱ्यांना चौकशीसाठी नोटिसा पाठवल्याची माहिती आहे. मात्र, या कारवाईला तुळजापूरातील पुजारी मंडळांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांचा आरोप आहे की, ही बदनामी करण्याचा कुटिल डाव आहे.

मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केले की, “कोणी दोषी आढळल्यास विश्वस्त मंडळात चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल, मात्र दोष सिद्ध होईपर्यंत कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही.”

पुजारी मंडळांचे अध्यक्ष विपीन शिंदे, अमरराजे कदम, आणि विशाल रोचकरी यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली की, “संपूर्ण पुजारी वर्गाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न होऊ नये. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, पण त्या आड कोणी राजकीय किंवा वैयक्तिक आकसातून चुकीचा प्रचार करू नये.”

राजकीय गुंतागुंत आणि फरारी आरोपी

तुळजापूर व तामलवाडी प्रकरणात आतापर्यंत ३५ आरोपींची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी १४ कोठडीत आहेत, तर २१ जण फरार आहेत. फरार आरोपींमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांचाही समावेश आहे. या सर्वांचा शोध सुरू असताना, त्यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार व कॉल रेकॉर्डच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

तपास अधिक खोलात जाण्याची शक्यता

मराठवाडा आधीच विविध कारणांमुळे वादात असताना, हा प्रकार पुन्हा एकदा या भागाला राष्ट्रीय चर्चेत घेऊन आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी काही मोठी नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात ड्रग्ज साखळीतील अजून दुवे जोडले जातील, असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Dr Abhaykumar Dandage

Dr Abhaykumar Dandage

About Author

डॉ अभयकुमार दांडगे (Dr Abhaykumar Dandage) हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार असून मराठवाडा हा त्यांचा लेखनाचा विषय आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात