मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा रविवारी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणार आहे. मात्र, या मेळाव्याच्या जाहिरातीसाठी लावलेल्या बॅनरवरून राजकीय वातावरण तापले आहे. दादर येथे मनसेच्या एका कार्यकर्त्याने लावलेल्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो झळकल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “आता सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.”
दादरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो झळकत होते. या चार पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे बॅनर झळकल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
मनसे स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बॅनरवर दिसायचा. मात्र, स्वतः बाळासाहेबांनी यास आक्षेप घेतल्यानंतर मनसेने त्यानंतर कधीही त्यांच्या फोटोंचा वापर केला नव्हता. त्यामुळे आता अचानक एका कार्यकर्त्याने बाळासाहेबांचा फोटो बॅनरवर लावल्यानंतर हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
या वादावर मनसेचे मुंबई प्रदेश प्रमुख संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत स्पष्ट केले की, “बाळासाहेबांचा फोटो बॅनरवर लावणे हे पक्षाचे अधिकृत धोरण नाही. ही एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते.”
मात्र, याच वेळी त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत, “महापौर बंगला ताब्यात घेताना बाळासाहेब देशाचे होते आणि आता ते फक्त तुमचे वडील कसे काय?” असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांना केला.
गुढीपाडवा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला उफाळलेला हा वाद मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संघर्ष अधिक चिघळवू शकतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावरून सुरू असलेला राजकीय वाद पुन्हा एकदा डोके वर काढत असून, तो आणखी तीव्र संघर्षाला कारणीभूत होण्याची शक्यता आहे.
या वादानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे या मुद्द्यावर काय भाष्य करतात, यावर मनसेचा पुढील राजकीय मार्ग स्पष्ट होईल.