मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र सायबर’च्या नाविन्यपूर्ण व नागरिक केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट आणि सायबर जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपटाचा समावेश होता.
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सायबर फसवणुकीसंदर्भातील फोन कॉल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा कॉल्सना प्रतिसाद देण्यासाठी आणि नागरिकांना योग्य माहिती देण्यासाठी चॅटबॉट व माहितीपट उपयुक्त ठरणार आहेत. सायबर गुन्हे घडण्याआधीच त्यांना आळा घालण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनेत्यांचे कौतुक करत सांगितले की, “अभिनेते शरद केळकर आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा जनजागृती मोहिमेत सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबतचा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानवी तस्करीसारख्या गंभीर घटनांकडे लक्ष वेधले आणि सांगितले की, “नोकरीचे आमिष दाखवून परदेशात नेऊन विक्री केल्या जाणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठीही सायबर जनजागृती मोहिमेत विशेष प्रयत्न व्हावेत. मानवी तस्करीतील बळींना अमानुष वागणूक दिली जाते, यासाठी जनजागृती अत्यावश्यक आहे.”
या कार्यक्रमात मराठी व हिंदी भाषेत तयार करण्यात आलेल्या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले, ज्यात शरद केळकर आणि अमिषा पटेल यांनी भूमिका साकारली आहे. या माहितीपटाद्वारे सायबर गुन्हेगारी आणि फसवणूक यासंबंधी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवली जाणार आहे.
कार्यक्रमास अभिनेता शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महाराष्ट्र सायबर विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.