महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना इशारा – “खबरदार, जर काही बोललात तर!”

मुंबई – “मराठीच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं” या चर्चेला पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उधाण आले असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट परदेशातून आपल्या पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास सक्त मनाई केली आहे. “हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. चुकीच्या पद्धतीने बोलल्यास पक्ष अडचणीत येऊ शकतो,” असा स्पष्ट इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरेंच्या या स्पष्टवक्तेपणामुळे सध्या दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना अचानक ब्रेक लागला असून, २९ एप्रिलपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या सकारात्मक प्रतिसादाने चर्चेला उधाण

दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद देत असे म्हटले होते की, “राज ठाकरे जर भाजपविषयी भूमिका स्पष्ट करणार असतील, तर युतीसाठी विचार होऊ शकतो”. त्यानंतर राज्यभरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर चर्चा सुरू झाली.

बॅनरबाजी आणि कार्यकर्त्यांची हालचाल

या वक्तव्यानंतर ठाकरे गटातील अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिकपणे युतीच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. काही जिल्ह्यांमध्ये बॅनर लावून “ठाकरे बंधू एकत्र यावेत” अशी मागणी करण्यात आली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही, “जर दोन भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत असतील, तर इतरांना यात त्रास का व्हावा?” असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला दुजोरा दिला.

मनसेत मात्र मतमतांतरे

दुसरीकडे, मनसेतील काही नेत्यांनी मात्र युतीच्या विरोधात सूर आळवायला सुरुवात केली आहे. विशेषतः गेल्या दोन दिवसांतील त्यांच्या वक्तव्यांनी ही मतभिन्नता स्पष्ट झाली. संदीप देशपांडे यांनी जाहीरपणे भूमिका मांडली असली तरी, राज ठाकरेंचे जवळचे सहकारी यशवंत किल्लेदार आणि अमेय खोपकर यांनी मात्र सोशल मीडियावर पोस्ट करून पक्षाची अधिक संयमी भूमिका स्पष्ट केली आहे.

राज ठाकरेंचा परदेशातून ‘ठाकरी इशारा’

सध्या परदेशात असलेले राज ठाकरे यांनी आजच आपल्या वरिष्ठ नेत्यांमार्फत पक्षातील कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या – “ठाकरे बंधूंच्या युतीबाबत कोणीही तोंड उघडू नये.” त्यांनी ठणकावून सांगितले की, हा विषय केवळ वरिष्ठ पातळीवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयापुरता मर्यादित राहील, आणि तोपर्यंत कोणतीही चर्चा किंवा प्रतिक्रिया अयोग्य ठरेल.

राज-उद्धव युतीचे भविष्य?

अलीकडेच एका टीव्ही मुलाखतीत राज ठाकरे यांनी “महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी एकत्र यायला हरकत नाही,” असं म्हटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरेंनीही “भूतकाळ विसरून एकत्र येण्यास तयार आहे” असं म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांतील चर्चेचे पेव फुटले.

मात्र सध्या तरी राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत चर्चेवर पूर्णविराम टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. आता २९ एप्रिलनंतर या संभाव्य युतीविषयी कोणतं अधिकृत चित्र स्पष्ट होतं, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागून राहणार आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात