मुंबई – महाभारतातील दुर्योधनाने आपल्या भावंडांना सुईच्या टोकाएवढीसुद्धा जागा नाकारली, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भावंडांना – विशेषतः राज ठाकरे यांना – सापत्न वागणूक दिली. त्यामुळेच त्यांना शिवसेना सोडावी लागली, असा घणाघात खासदार आणि शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला.
ठाण्यात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “आज उद्धव ठाकरे यांच्यात जनसमुदाय खेचणारी क्षमता राहिलेली नाही. त्यामुळेच त्यांना महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंची गरज भासत आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
म्हस्के म्हणाले, “दुर्योधनाने भावंडांना सुईच्या टोकेएवढीसुद्धा जागा देण्यास नकार दिला होता. तशीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यांनी राज ठाकरे यांना पक्षातून दूर लोटले. उद्धव ठाकरे म्हणजे आधुनिक दुर्योधनच!”
’वक्फ बोर्ड’वरूनही घणाघात
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या चर्चेदरम्यान खासदार अरविंद सावंत (लोकसभा) आणि संजय राऊत (राज्यसभा) यांनी विरोध केला होता, याकडे लक्ष वेधत म्हस्के म्हणाले, “जेव्हा वक्फ जमिनींचा वापर देशविरोधी कारवायांसाठी केला जातो, तेव्हा त्या संदर्भातल्या सुधारणा विधेयकाला विरोध का? लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मौलवींच्या माध्यमातून मत मागवता, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करताना लाज वाटते. हेच तुमचं हिंदुत्व आहे का?”
’कैलास जीवन’ टोला आणि ‘कॅफेटेरिया’वरून टीका
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाढती लोकप्रियता पाहून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अस्वस्थ झाले आहेत. आता त्यांना ‘कैलास जीवन’ लावण्याची वेळ आली आहे,” असा उपरोधिक टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.
राज ठाकरे यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांवर टीका करत राऊत यांनी त्या घराला ‘कॅफेटेरिया’ म्हटले होते, यावर टीका करत म्हस्के म्हणाले, “राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय असे वक्तव्य करू शकतात का? जे घर पाहुण्यांचे स्वागत करतं, त्याला हॉटेल म्हणायचं का? अशा लोकांशी राज ठाकरे यांचं सहकार्य शक्य आहे का?”
’दुटप्पी भूमिका’ आणि ‘भेसळ’वरून सवाल
“एकीकडे उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात, आणि दुसरीकडे त्यांच्याशी भेटी घेतात. ही दुटप्पी भूमिका नाही का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांनी शरद पवार यांचा पक्ष ‘भेसळयुक्त’ असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून म्हस्के म्हणाले, “खरंच राष्ट्रवादी काँग्रेस भेसळयुक्त आहे की अस्सल, हे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट करावं.”