Twitter : @NalavadeAnant
मुंबई
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद हे एक चॅलेंज असून शहरातील सामान्य जनतेचे प्रश्न आहेत. त्यामुळे पक्ष तळागाळापर्यंत बांधण्याचे उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून पुढे जाणार आहोत, अशी ग्वाही माजी खासदार व मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ (Sameer Bhujbal takes over the charge of the President of the Mumbai Regional NCP) यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना दिली.
मंत्रालयासमोर असलेल्या प्रदेश कार्यालयात आज राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी मुंबई विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर समीर भुजबळ यांनी पदाची धूरा हाती घेतली. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व प्रश्नांना मोकळी उत्तरे दिली.
यावेळी समीर भुजबळ यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल विशेष आभारही मानले.
जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष यांच्या नेमणूका करणे आणि पक्षाला घराघरात पोचवण्यासाठी येणाऱ्या काळात काम करणार आहोत. शिवाय झोपडपट्टी, चाळी यांचे प्रश्न, महानगरपालिका व म्हाडाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी पक्षाची ताकद वापरणार असल्याचे सांगतानाच सर्व जातीधर्मांतील लोकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले.
नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम चांगले केले आहे. आता त्यांचे कार्य मी पुढे घेऊन जाणार आहे. आता वेगवेगळ्या नेमणूका करण्याची जबाबदारी माझ्यावर आली असून ती जबाबदारी पेलण्याचे काम करणार असल्याचेही भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, शिवाजीराव नलावडे, बापू भुजबळ, आप्पा पाटील आदींसह मुंबई शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.