मुंबई : “बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून सत्तेसाठी हिंदुत्वाचा त्याग करणारा उबाठा गटच आज कृत्रिम बनला आहे,” अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
“बाळासाहेबांचे भाषण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) माध्यमातून दाखवले गेले, मात्र खरे पाहता खुद्द उबाठा गटच आर्टिफिशियल झाला आहे. कारण सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व दोन्हीही सोडून दिले,” असा आरोप निरुपम यांनी केला.
“बाळासाहेबांनी स्पष्टपणे म्हटले होते की, ‘काँग्रेससोबत कधीच जाऊ नका. गेलात तर शिवसेनेचे दुकान बंद करा.’ पण उबाठा गटाने केवळ खुर्चीसाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधले,” असा टोला त्यांनी लगावला.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर बोलताना निरुपम म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर उबाठा मौन का बाळगतो? ममता बॅनर्जी यांचा निषेध का करत नाहीत? कारण उबाठा त्यांच्या सोबत आहे.”
“वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र काही जण कोर्टाने मनाई केली आहे, असा चुकीचा प्रचार करत आहेत. वक्फ बोर्ड ही बिगर धार्मिक संस्था आहे, तर मंदिर ट्रस्ट पूर्णपणे धार्मिक संस्था असते. त्यामुळे दोघांची तुलना होऊ शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उल्लेख करत निरुपम म्हणाले, “या धोरणामुळे विद्यार्थी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांत पारंगत होतील. इंग्रजीच्या सक्तीवर कोणीही आक्षेप घेत नाही, पण हिंदीवर आक्षेप घेतात, हे केवळ राजकीय ढोंग आहे.”