मुंबई
सध्या देशभरात अयोध्या आंदोलनावरुन श्रेयवादाचं राजकारण सुरू आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. एकीकडे अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात अयोध्या आंदोलनाचं श्रेय कुणाचं, यावरही चर्चा सुरू आहे. दरम्यान आज संजय राऊत यांनी समाज माध्यमांशी बोलताना भाजपवर घणाघात केला.
काय म्हणाले संजय राऊत…
शिवसेनेच्या उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, अयोध्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं योगदान काय असा सवाल उपस्थित करणाऱ्यांनी त्यांचं योगदान काय आधी याचं उत्तर द्यावं.. आज स्वत: ला योद्धा मानणारे लोक ज्यावेळी अयोध्येत आंदोलन सुरू होतं, तेव्हा कसे पळून गेले होते. त्यावेळी भाजपने या आंदोलनामागे शिवसैनिक असल्याचा दावा केला होता आणि बाळासाहेब ठाकरेंनी अयोध्या आंदोलनाचं समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यावेळी पळून गेलेल्यांनी आम्हाला सवाल विचारू नये.
यावेळी बाळासाहेब म्हणाले होते की, ‘जर शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली असं भाजपचं म्हणणं असेल तर शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी काम केलं याचा मला अभिमान आहे.’ मात्र यावेळी भाजपचे मोठ मोठे नेते कुठे गायब झाले होते, असा सवाल संजय राऊतांनी यावेळी केला.