मुंबई – महाराष्ट्रात महिला अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होत असून महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दरवर्षी ६४,००० महिला आणि मुली बेपत्ता होतात, तर महिला सुरक्षिततेसाठी तुटपूंजी तरतूद केली जाते, अशी तीव्र टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान केली.
गृहविभागाच्या मागण्यांवर भाष्य करताना वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना महिलांचा विसर पडल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी शिंदे सरकारला महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर धारेवर धरले होते, मग आता अर्थमंत्री झाल्यानंतर निर्भया फंडासह महिलांसाठी तुटपूंजी तरतूद का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, शक्ती कायदा संमत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी केली.
ते पुढे म्हणाले, नागपुरातील हिंसाचार प्रकरणात पोलिस यंत्रणेचे अपयश स्पष्ट झाले आहे. दगडफेक, पेट्रोल बॉम्ब हल्ले आणि जाळपोळ यासंदर्भात सरकार जबाबदार नाही का? असा प्रश्न त्यांनी केला. संविधानाची शपथ घेऊनही बेफाम वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक भाष्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागावर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द प्रकल्पासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली. तसेच, जलसंपदा विभागाऐवजी सिडकोला धरण प्रकल्प देण्यामागचे कारण स्पष्ट करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे, असे ते म्हणाले. ८०० कोटींच्या प्रकल्पाचा खर्च १४०० कोटींवर गेल्याचा आरोप करत, ही लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली. कंत्राटदारांची देयके प्रलंबित राहिल्याने अनेक पाणीपुरवठा प्रकल्प ठप्प झाले असून गावागावांत पाण्यासाठी हाहाकार माजला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.