शरद पवारांची नवी राजकीय खेळी मराठवाड्यात चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या वृत्ताने मराठवाड्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत स्पष्टता झालेली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सत्ता काबीज करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या शरद पवारांना आता अजित पवार अधिक जवळचे वाटू लागले आहेत, अशी चर्चा मराठवाड्यात उघड उघड होत आहे. मासा ज्याप्रमाणे पाण्याशिवाय जगू शकत नाही, तशीच अवस्था काही राजकारणी लोकांची झालेली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील आमदार आग्रही आहेत, असे वृत्त आल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वैयक्तिक भेटी व बैठकाही झाल्या होत्या. तसे वृत्तही प्रसारमाध्यमांत झळकले होते. तेंव्हापासूनच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रितकरणाचे वारे वाहू लागले होते. मराठवाड्यातही त्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची जवळीकता वाढविली होती. मराठवाड्यातही आता असे पक्ष प्रवेश सोहळे सुरू झालेले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे अतिशय चाणाक्ष नेते म्हणून ओळखले जातात. देशाच्या राजकारणात त्यांची एक वेगळी ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूकीत मूठ बांधणार्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी, शरद पवार हे अग्रस्थानी होते. परंतु नंतर हळूहळू इंडी आघाडीचे काय झाले हे सर्वांनाच ठावूक आहे, असो.
सध्या पुन्हा एकदा शरद पवार यांना भारताच्या भविष्यातील राजकारणाचे वेध स्पष्टपणे दिसू लागले आहेत. सध्याचे भारत – पाकिस्तान युद्धाचे ढग केवळ भारतीयांच्या एकतेचे दर्शन घडवीत नाही तर राजकीय परिस्थितीचेही दर्शन घडविते आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे तमाम भारतीयांची मनस्थिती काय आहे व पुढे काय राहील, याचेही भाकीत स्पष्टपणे दिसून येत आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपने चांगले बळ दिले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साईडला करून कोणाची कशी जिरवायची याचे राजकीय गणित अलीकडच्या राजकीय परिस्थितीवरून स्पष्टच झाले आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांनीही युद्धजन्य परिस्थितीची पोस्टरबाजी करून मोदींचा जयजयकार केला आहे. त्यांना भविष्यात मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे महानगरपालिकेत सत्ता व महत्त्वाचे स्थान पाहिजे आहे. त्यामुळे मोदी व भाजपचा उदोउदो ईच्छा असो, किंवा नसो करणे भागच आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे भारतातील सर्व नागरिकांची छाती अभिमानाने फुलली असताना राजकारणही ढवळून निघाले आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही) एकत्र येणे गरजेचे वाटत असतांना शरद पवारांनी लोकमान्य नेता म्हणून अजित पवार यांना मनोमन स्वीकारले आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण सुप्रिया सुळे यांच्या हातात पक्ष देवूनही कांही जास्त फायदा होणार नाही, हे देखील शरद पवार यांना लक्षात आलेले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच लक्षात आले आहे. अशा परिस्थितीत अलीकडेच सोलापूर जिल्ह्यातील आ. अभिजीत पाटील, नारायण पाटील, उत्तमराव जानकर, राजू खरे यांनी शरद पवारांना भेटून आपण राष्ट्रवादीत गेले पाहिजे, अशी विनंती केली होती. विरोधी पक्षात असतांना मोठ्या प्रमाणात निधीची अडचण येत असल्याची भावनाही या आमदारांनी व्यक्त केली होती. या आमदारांनी वारंवार अजित पवार यांची भेट घेवून आपली भूमिकाही मांडली होती. आगामी काळात अजित पवारांसोबत गेल्यास मतदारसंघ टिकवता येईल, लोकांची कामे करता येतील, अशी आमदारांची भावना असल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्यातही अशीच परिस्थिती आहे. येथील नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून आपापल्या अडचणी मांडल्या. या आमदारांचा बोलविता धनी शरद पवार हेच असणार, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. कारण किमान महाराष्ट्रात तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पराभूत करणे शक्य नाही, याची त्यांना खात्री आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता आता जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या नाही तर उरली-सुरली राजकीय इभ्रतही संपेल, अशी भितीही शरद पवार यांना वाटत असावी. आपण आपल्या वयोमानानुसार राजकीय सेवानिवृत्ती घ्यावी, असेही त्यांनी यापूर्वी बोलून दाखविले होते. असे वक्तव्य करून जनतेची सहानुभूती मिळते की नाही, किती सहानुभुती आपल्यासोबत आहे, याचीही चाचपणी त्यांनी केली होती. त्यामुळे आता किमान सुप्रिया सुळे यांच्यासाठी भविष्यातील राजकीय वाट बिकट ठरू नये, म्हणून का होईना परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येतील, असे राजकीय संकेत दिसत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मनातही हेच असल्याने ते वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारची राजकीय खेळी खेळत आहेत. मराठवाड्यातही आता याबाबत खुलेआम चर्चा होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेशिवाय कांही राजकारणी राहुच शकत नाहीत, असे अनेकांच्या बाबतीत बोलले जाते. कदाचित ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही भविष्यातील स्वतःची व कुटुंबीयांची राजकीय नाडी ओळखली असावी, व त्यातूनच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचा चेंडू मैदानात फेकलेला दिसतोय. लवकरच हे दोन्ही नेते एकत्र येतील व शरद पवार यांच्या हातातच राष्ट्रवादीची कमान राहील, असे मराठवाड्यात बोलले जात आहे.