महाराष्ट्र ताज्या बातम्या

बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करण्याआधी शिवसेनेने स्वतःचे चारित्र्य तपासावे – सिद्धार्थ मोकळे

’सामना’तील टीकेला वंचित बहुजन आघाडीचे जोरदार प्रत्युत्तर!

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या मुखपत्र ‘सामना’ मध्ये १४ एप्रिल रोजी प्रकाशित अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला वंचित बहुजन आघाडीने तीव्र शब्दांत प्रतिवाद केला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी यासंदर्भात निवेदन जारी करून शिवसेनेवर थेट आरोप करत बाळासाहेब आंबेडकरांच्या लढ्यांची आठवण करून दिली आहे.

सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “फुले चित्रपटावर ब्राह्मण संघटनांकडून विरोध झाला असताना, त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते होते. त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अन्यायकारक निर्णयाला ठाम विरोध केला होता. त्या संघर्षात महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष सहभागी नव्हता.”

मोकळे यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक भूमिका उघड करत म्हटले की, “२५ वर्षे शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती. गोध्रा हत्याकांडाच्या काळातही शिवसेनेने नरेंद्र मोदी आणि भाजपच्या बाजूने भूमिका घेतली होती. अशा पक्षाने आज बाळासाहेब आंबेडकरांसारख्या संघर्षशील आणि निष्ठावान नेत्यावर टीका करणे म्हणजे राजकीय दांभिकपणाचे उत्तम उदाहरण आहे.”

बाळासाहेब आंबेडकर हे केवळ विधानं करून थांबत नाहीत, तर थेट रस्त्यावर उतरून आणि न्यायालयात लढून समाजासाठी काम करतात, असे मोकळे म्हणाले. त्यांनी नमूद केले की, “मतदान प्रक्रिया संध्याकाळी सहा नंतर सुरू ठेवण्याच्या निर्णयाला त्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातही त्यांनी रस्त्यावर उतरून आणि कायदेशीर मार्गाने आवाज उठवला. बिहारमध्ये महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात यावा यासाठी त्यांनी महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले.”

वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे सांगितले की, “बाळासाहेब आंबेडकर हे जनतेच्या प्रश्नांसाठी झगडणारे, भूमिकेवर ठाम राहणारे नेते आहेत. त्यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. म्हणून शिवसेनेने इतरांवर बोट दाखवण्याआधी स्वतःच्या इतिहासाचे आत्मपरीक्षण करावे,” असे स्पष्ट आणि कठोर शब्दांत आवाहन सिद्धार्थ मोकळे यांनी केले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात