येवला भाजपाचे संस्थापक सदस्य धनंजय कुलकर्णी यांची वरीष्ठ नेतृत्वाकडे तक्रार
येवला, नाशिक : उत्तर महाराष्ट्र भाजपाचे विभागीय संघटनमंत्री विजय चौधरी यांची तात्काळ पदमुक्ती करावी, अशी मागणी येवला भाजपाचे संस्थापक सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत चौधरी यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले असून, वरिष्ठ पक्षनेतृत्वाला लेखी निवेदनाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.
कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “विजय चौधरी हे काँग्रेसचे माजी कार्यकर्ते असून, भाजपाची सत्ता केंद्र व राज्यात आल्यावरच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून पद मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वारंवार भेटी घेत स्वतःची विभागीय संघटनमंत्री म्हणून नियुक्ती करून घेतली. यामध्ये बावनकुळे यांना त्यांच्या खऱ्या पार्श्वभूमीची माहिती नसावी.”
ते पुढे म्हणाले की, “२०२२ पूर्वी विजय चौधरी कोण होते, पक्षवाढीसाठी त्यांचे कोणतेही योगदान नाही, हे स्पष्ट आहे. ते स्वतःला मंत्री समजून सोशल मीडियावर आपले दौरे, फोटो, पोस्ट्स जाहीर करत स्वतःची प्रतिमा मोठी दाखवण्याचा प्रयत्न करतात. ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते, ज्यांनी आणीबाणी काळात सत्याग्रह केला, तुरुंगवास भोगला, अशा कार्यकर्त्यांची त्यांना माहितीही नसेल.”
कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, चौधरी यांच्या नेमणुकीनंतर उत्तर महाराष्ट्रात संघटन होण्याऐवजी विघटन होत असल्याचे चित्र आहे. चमचागिरी करणाऱ्या, चौधरी यांना पार्टी देणाऱ्यांना पक्षातील पदे देण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांनी असेही आरोप केले की, राज्य विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी पत्रकारांना मोबदला देत चौधरी यांनी आपल्या पात्रतेचे खोटे चित्र उभे केले.
“भाजपाचा विस्तार आणि प्रभावी संघटन होण्यासाठी चौधरी यांना तातडीने विभागीय संघटनमंत्री पदावरून दूर करून, जुन्या, सर्वसमावेशक कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात यावी,” अशी ठाम मागणी धनंजय कुलकर्णी यांनी केली आहे.