मुंबई – राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गुन्हेगारी प्रचंड वाढली असून, बीड जिल्ह्यात तर गुंडाराज निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. रस्त्यांवर सुरू असलेले गँगवॉर आता थेट तुरुंगात पोहोचले आहे. यावर पोलीस आणि गृहविभाग काय करत आहेत? असा संतप्त सवाल उपस्थित करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राज्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर झाली असतानाही सरकारला त्याचे गांभीर्य नाही. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, सरकारी आशिर्वादाने वाळू, जमीन, पवनचक्की, मटका, दारू आणि कोळसा माफिया फोफावले आहेत. हे माफिया दररोज पोलिसांना आव्हान देत आहेत, तर खून, दरोडे, बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
सपकाळ पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जाते, तरीही आरोपींना अटक होत नाही. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनाच पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करावे लागते, ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे.
पूर्वी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचे उदाहरण संपूर्ण देशभर दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतीशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येथे येत होते, ज्यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास होत होता. मात्र, गेल्या काही दिवसांतील सरकारच्या आणि विशेषतः गृहविभागाच्या निष्क्रीयतेमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा गेला आहे.
आता महाराष्ट्राची तुलना उत्तर भारतातील जंगलराजशी केली जाऊ लागली आहे. खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदारच “बीडचा बिहार झाला आहे, तालिबानसारखी परिस्थिती आहे” असे म्हणत आहेत, यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.
बीडमध्ये ‘आका’ आणि ‘खोक्या’ या टोळ्यांना सत्ताधाऱ्यांचा आशिर्वाद आहे, असा आरोप करत सपकाळ म्हणाले की, गुन्हेगारांची मजल इतकी वाढली आहे की बीडच्या तुरुंगातच कराड आणि गित्ते टोळ्यांमध्ये गँगवॉर सुरू झाले आहे. त्यामुळेच बीड कारागृहातून महादेव गित्ते यांच्यासह काही आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलविण्यात आले आहे. आता तुरुंगही सुरक्षित राहिले नाहीत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.