मुंबई – “हा देश संविधानाने चालतो आणि संविधानच सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यामुळे जर संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला, तर सत्ता बदलल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम इशारा काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिला. भारतीय गणराज्याच्या ७५व्या वर्षानिमित्त संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवरील चर्चेत भाग घेताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली.
विधानसभेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “स्वातंत्र्य, अधिकार आणि कर्तव्य संविधानाने दिली आहेत. संविधान हा कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ आहे. महात्मा गांधी यांच्या सुचनेनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांनी जगातील सर्वोत्तम संविधान देशाला दिले.”
ते पुढे म्हणाले, “आपल्या संविधानाचा पाया संतांच्या शिकवणुकीत आहे. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी समाजाला समतेचा आणि विवेकवादाचा संदेश दिला. संत जनाबाई आणि बहिणाबाई यांनी महिलांच्या सन्मानासाठी लढा दिला आणि हेच प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसते.”
वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल करत म्हटले, “महाराष्ट्रात संविधानाची पायमल्ली एका राज्यपालांनी सुरू केली. सर्वोच्च पदावर बसून त्यांनी राजकीय भूमिका घेतल्या आणि महापुरुषांचा अपमान केला. त्यानंतर दोन पक्ष फोडून महायुती सरकार स्थापन करण्यात आले. आज तीन वर्षांनंतरही हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे.”
वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले, “संविधानात धर्मनिरपेक्षता हे मूलभूत तत्त्व आहे. मात्र, सत्ताधारी सतत एका विशिष्ट समाजाविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहेत. सरकारी यंत्रणाही दुजाभाव करत आहे. हे संविधानाच्या तत्त्वांना छेद देणारे आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले, “राज्यात कोणत्याही महापालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत, निवडणुका होत नाहीत, ही थेट संविधानाची पायमल्ली आहे.”
शिवछत्रपतींच्या पराक्रमावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या निष्पाप स्त्रीचा सन्मान करायला शिकवले. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारे छत्रपतीच औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात ठेवतात. ही कबर महाराष्ट्राच्या शौर्याची आणि लढाऊ बाण्याची खूण आहे. आता ते थडगे तोडून शिवरायांचा पराक्रम आणि इतिहास पुसायचा आहे का?”
वडेट्टीवार यांनी इशारा देत म्हटले, “भारतीय लोकशाही मजबूत आहे. पण सध्या द्वेषाच्या वातावरणामुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जर संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला, तर सत्ता बदलल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि अंतर्मुख व्हावे.”