मुंबई – येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात नववर्षाची सुरुवात होत असताना, राज्यातील सर्व व्यावसायिक वाहनांवर लिहिले जाणारे सामाजिक संदेश, जाहिराती आणि प्रबोधनात्मक माहिती मराठीत असणे बंधनकारक करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी परिवहन विभागाला याबाबत स्पष्ट निर्देश दिले.
माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले, “मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असून, राज्यातील बहुतांश नागरिक मराठी भाषिक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राज्य शासनावर मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “राज्यातील व्यावसायिक वाहनांवर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारखे सामाजिक संदेश हिंदी किंवा अन्य भाषांमध्ये लिहिले जातात. यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारावर मर्यादा येतात. त्यामुळे यापुढे ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ यांसारखे संदेश थेट मराठीत लिहिणे बंधनकारक असेल.”
सरनाईक यांनी सांगितले की, “येत्या गुढीपाडव्यापासून (३० मार्च २०२५) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश, जाहिराती आणि प्रबोधनात्मक माहिती फक्त मराठीत असावी, यासाठी परिवहन आयुक्तांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
परिवहन मंत्री यांनी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे सांगताना स्पष्ट केले, “मराठी भाषेच्या गौरवासाठी आणि जनजागृती अधिक प्रभावी होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे मराठी भाषेला योग्य मान मिळेल आणि राज्यातील जनतेपर्यंत सामाजिक संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल.”