मुंबई – मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी सभागृहात केला. यासंदर्भातील संभाषण असलेला पेनड्राइव्ह त्यांनी थेट सभापतींकडे सादर केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दानवे यांनी आपल्या भाषणात एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट करत सांगितले की, बेटिंग रॅकेटमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन यांचा समावेश असून, या रॅकेटमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचाही वापर केला जात आहे. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘लोटस २४’ या अॅपच्या माध्यमातून हे बेटिंग झालं. आता ही मंडळी मुंबईत आयपीएलसाठी दाखल झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
दानवे यांनी यावेळी परिवहन, सिडको, महसूल आणि आरोग्य विभागांतील घोटाळ्यांचे प्रकरण सभागृहात मांडले. अनेक मंत्र्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “राज्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे,” असे सांगत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
अंबादास दानवे यांनी राज्यातील गुन्हेगारी वाढ आणि महिलांवरील अत्याचारांबाबतही गंभीर आरोप केले.
• मागील दोन वर्षांपासून ‘क्राईम इन महाराष्ट्र’ अहवाल प्रसिद्ध झालेला नाही.
• राज्यात ५६४ गंभीर गुन्हे दाखल, त्यात दंगली, बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये मोठी वाढ.
• नागपूर, पुणे, संभाजीनगर येथे बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ.
• दररोज २२ बलात्कार आणि ४५ विनयभंगाच्या घटना घडत आहेत.
त्यांनी सरकारच्या ‘मिशन शक्ती’ अभियानावरही प्रश्न उपस्थित करत सांगितले की, “महिला सुरक्षेसाठी असलेल्या निधीपैकी फक्त २२ टक्केच खर्च करण्यात आला आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”
दानवे यांच्या आरोपांमुळे सभागृहात गोंधळ उडाला. बेटिंग रॅकेट, गुन्हेगारी वाढ, महिला अत्याचार आणि घोटाळे या सर्व मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आता या आरोपांची दखल सरकार घेते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.