X: @therajkaran
मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) निवासस्थानी झालेल्या बैठकीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. स्वत:ला स्वाभिमानी म्हणवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या दोन-चार जागांसाठी दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडी घासत आहेत. डुप्लीकेट शिवेसना आणि डुप्टीकेट राष्ट्रवादी यांचं नशीबच असे आहे. नुसत्या 4 ते 5 जागा यांना दिल्या जात आहेत, कुत्र्यासमोर जसं हाडूक टाकतात तशी यांची स्थिती आहे, असा घणाघात राऊत यांनी केला आहे.
कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कारखान्यावर झालेल्या जप्तीवरही राऊत यांनी भाष्य केले आहे. रोहित पवार यांच्यावर सातत्याने तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. त्यांचा छळ केला जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा छळ केला जात आहे. त्यांना वारंवार तपासासाठी बोलावलं जात आहे. असा काय गुन्हा केला आहे रोहित पवार यांनी?, असा सवाल राऊत यांनी विचारला.
ते म्हणाले, पण माझा इशारा आहे. आमच्यासारखे स्वाभिमानी लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमची महाराष्ट्र तोडण्याची जी इच्छा आहे, मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानित करण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार नाही, असंही ते म्हणाले. उद्योग आहे, व्यवहार आहे, लहान सहान गोष्टी मागेपुढे झाल्या असतील, त्याच्यासाठी धडाधड धाडी टाकून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणे आणि बदनाम करणं अयोग्य असल्याचे राऊत म्हणाले.
लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. रोहित पवार यांनी भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोगलशाहीपुढे न झुकण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे आणि आम्ही घेतली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागावाटपाबाबत रात्री 1 वाजेपर्यंत बैठक सुरू होती. बैठकीत महायुतीच्या महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून त्याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती आहे.