महाराष्ट्र ताज्या बातम्या

औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून विधिमंडळात गदारोळ; अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाला “उत्कृष्ट प्रशासक” म्हणून गौरविल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र गदारोळ झाला. या वक्तव्याच्या निषेधार्थ महायुतीच्या आमदारांनी आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली. या वादळी वातावरणामुळे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

विधानसभेत घोषणाबाजी आणि गोंधळ

विधानसभेचे कामकाज सुरू होताच महायुतीच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन “छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो”, “धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो”, “हर हर महादेव” अशा घोषणा देत अबू आझमी यांच्यावर कारवाईची मागणी केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनीही आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली.

या गोंधळात विरोधी पक्ष नेते आदित्य ठाकरे हेही सहभागी झाले. त्यांनी “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणा देत आपल्या सहकाऱ्यांना उत्तेजन दिले. गोंधळ वाढत गेला तसतसे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले.

“देशद्रोह्याला विधिमंडळात स्थान नाही” – शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “धर्मवीर संभाजी महाराजांवर ४० दिवस अत्याचार करणारा, हिंदू मंदिरांची तोडफोड करणारा, महिलांवर अत्याचार करणारा, बापाला तुरुंगात टाकणारा आणि भावांची हत्या करणारा औरंगजेब हा मारेकरी होता. त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमी यांना विधानसभेत बसण्याचा अधिकार नाही.”

“औरंगजेबाची कबर तोडा” – मुनगंटीवार यांची मागणी

भाजपचे वरिष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारने औरंगजेबाची कबर तोडण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा, अशी मागणी केली. महेश लांडगे यांनी “मुस्लिम मतांसाठी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांना ठेचून काढा,” असे सांगितले. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही “आझमींना विधिमंडळात स्थान नाही,” असे स्पष्ट केले.

विधान परिषदेचेही कामकाज तहकूब

विधान परिषदेच्या सभागृहातही महायुतीच्या आमदारांनी आझमी यांच्या निलंबनाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळामुळे प्रारंभी १५ मिनिटे, त्यानंतर अर्धा तास आणि अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

कामकाज दिवसभरासाठी स्थगित

विधानसभेत वारंवार गोंधळ झाल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ न थांबल्याने त्यांनी अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. विधान परिषदेचे कामकाजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात