काँग्रेस नेते आ.नाना पटोले यांचा इशारा
मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्येची माहिती गृहखात्याकडे नव्हती का? असा संपप्त सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उद्या विधानसभेत हक्कभंग आणू,असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकाल सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन रात्री चर्चा केली व त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. सरकारला या प्रकरणाची सर्व माहिती होती पण त्यांनी ती लपवली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व जनतेची दिशाभूल केली.सरपंच हत्येमध्ये वाल्मिक कराड व त्याचे सहकारी आरोपी असताना सरकारने या प्रकरणातील माहिती लपवल्याने त्यांनाही सरआरोपी केले पाहिजे,अशी मागणीही उद्या सभागृहात करु असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
औरंगजेबाच्या मुद्द्यावर बोलताना पटोले म्हणाले की, सभागृह चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे.पण तेच बहुमताच्या जोरावर गोंधळ घालून सभागृह बंद पाडत आहेत, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टीच आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रशांत कोरटकरने अपशब्द वापरून महाराजांचा अपमान केला त्याच्यावर सरकार कडून काहीच बोलले जात नाही. इतकेच काय महाराजांचा अपमान करणारे काही जण मंत्रिम़ंडळातही आहेत.जर कोणी महापुरुषांचा अपमान करत असेल तर त्याचे समर्थन कसे करता, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही पटोले यांनी यावेळी ठणकावून सांगितले.