By: योगेश त्रिवेदी
मुंबई – बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरमध्ये गेली ४२ वर्षे सातत्याने सुरु असलेली ‘वसंत व्याख्यानमाला’ यंदा ४३व्या वर्षात पदार्पण करत आहे. या व्याख्यानमालेचा श्रीगणेशा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून झाला होता. त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यंदाही केला आहे.
ही व्याख्यानमाला सोमवार, २८ एप्रिल ते बुधवार, ३० एप्रिल २०२५ या तीन दिवसांत सायंकाळी ७.३० वाजता, एकता विनायक चौकाजवळील टाटा संग्रहालय केंद्रासमोर, जय महाराष्ट्र नगरमध्ये पार पडणार आहे.
या वर्षीच्या व्याख्यानमालेत खालील विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत:
• सोमवार, २८ एप्रिल – ‘मनाचे व्यवस्थापन’ या विषयावर प्रा. शैलेश रेगे (जीवनविद्या मिशन) यांचे मार्गदर्शन.
• मंगळवार, २९ एप्रिल – ‘एक संवाद हत्तीशी’ या अनोख्या विषयावर ‘हत्ती मित्र’ आनंद शिंदे यांचे सादरीकरण.
• बुधवार, ३० एप्रिल – ‘आज अर्थव्यवस्थेत आपले उत्पन्न, खर्च, गुंतवणूक व बचत सुरक्षित आहे का?’ या विषयावर बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांचे मार्गदर्शन.
विजय वैद्य यांच्या परंपरेप्रमाणे यंदाही व्याख्यानमालेत मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
• जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते हेमंत पाटकर
• शारदा पुरस्कार – आपल्या सुमधूर सुसंवादिनी वाणीने ४५ वर्षांपासून रसिकांची मनं जिंकणाऱ्या मंगला खाडिलकर
• प्रेरणा पुरस्कार – बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या मनमिळावू अध्यक्षा रुचिरा दिघे
कार्यक्रम विनामूल्य असून सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक सचिन वगळ आणि प्रा. नयना रेगे यांनी केले आहे.
या उपक्रमाला विजय वैद्य यांचे कुटुंबीय – वैशाली वैद्य, वैभव वैद्य आणि विक्रांत वैद्य – यांचेही संपूर्ण सहकार्य लाभणार आहे.