महाराष्ट्र ताज्या बातम्या

ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी दूर करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाला आश्वासन

एक महिन्यात सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देश

पत्रकारांना कॅशलेस उपचार, शिवनेरीतून मोफत प्रवासासाठी सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश

मुंबई : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी दूर करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी येत्या एक महिन्यात अभ्यास करून सुधारित नियमावली तयार केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीला दिले. पत्रकारांना खाजगी व नामवंत रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळण्यासाठी एक महिन्यात प्रस्ताव सादर करावा, तसेच एसटी महामंडळाच्या शिवनेरी आणि शिवाई बसेसमध्येही मोफत प्रवास करता यावा म्हणून सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक झाली. नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी वार्ताहर संघाच्या मागण्यांवर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला मुख्य सचिव सुजता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर – सिंह, प्रधान सचिव आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नानुटीया, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, उपाध्यक्ष आलोक देशपांडे, सरचिटणीस दीपक भातुसे, खजिनदार विनोद यादव उपस्थित होते.

दिलीप सपाटे यांनी सुरुवातीला पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांची माहिती देत या योजनांमधील त्रुटी दूर करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वच मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत सबंधित विभागांना निर्देश दिले.

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेचे लाभ मिळण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. योजनेचा लाभ मिळण्यासाठी सध्याची वयाची ६० वर्षाची अट ५८ वर्ष करावी तर ३० वर्ष पूर्णवेळ पत्रकारितेची अट शिथिल करून २५ वर्ष करण्याची मागणी वार्ताहर संघाने केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विभागाला एका महिन्याच्या आत सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले. अन्य पत्रकार संघटनांकडून निवेदने घेऊन त्याचा ही अभ्यास करून ही नियमावली लागू करण्यास त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेसाठी अनावश्यक कागदपत्रे न मागता ज्या पत्रकारांकडे ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती पत्रिका असेल त्यांचा समावेश या योजनेत करण्याच्या मागणीवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याबाबत तपासणी करून नियमावलीत सुधारणा करण्यास सांगितले. त्यामुळे या योजनेचे लाभ ज्येष्ठ पत्रकारांना मिळणे सुलभ होणार आहे.

स्व. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्येही सुधारणा करण्याची मागणी वार्ताहर संघाने केली. त्यावर पत्रकारांना खाजगी व नामवंत रुग्णालयात कॅशलेस पद्धतीने उपचार मिळण्यासाठी एका महिन्यात योजना तयार करण्याचे निर्देश माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांना दिले. कल्याण निधीतून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आजारपणात आर्थिक मदत मिळते. त्या आजारांच्या संख्येत वाढ करणे, ही मदत ३ लाखांपर्यंत वाढविणे, अधिस्वीकृतीधारक पत्रकाराच्या निधनानंतर पती किंवा पत्नीला सध्या १ लाखाची मदत दिली जाते ती ३ लाखांपर्यंत वाढविणे याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधितांना निर्देश दिले.

पत्रकारांना एसटीच्या शिवनेरी आणि शिवाई बसेस मध्येही मोफत प्रवासाची सुविधा देण्याबाबतही सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांना दिले.

याशिवाय मंत्रालयात पत्रकारांना प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी पंधरा दिवसात दूर करून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे मंत्रालयात प्रवेशासाठी फेसरिडिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या गृहनिर्माण योजनेतील अडचणी दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात