मुंबई – राज्य सरकार शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करत आहे, मग राज्य शिक्षण मंडळाचे काय होणार? मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेत बोलताना सुळे म्हणाल्या की, सीबीएसई अभ्यासक्रमात मराठीचा किती टक्का असेल? महाराष्ट्राचा इतिहास त्यात असेल का? याबाबत सरकारकडे कोणतीही स्पष्टता नाही. शिक्षण मंडळ बंद करण्याचा विचार आहे का? असा प्रश्नही त्यांनी केला.
राज्यात वाढत्या गुन्हेगारीवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “सध्या महाराष्ट्राचा गृहमंत्रालय झोपले आहे का?” असा टोला लगावत प्रशांत कोरटकर प्रकरणात सरकारने केंद्राची मदत घ्यावी, अशी मागणी केली. तसेच बीड आणि परभणीतील घटनांवर सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.
सरकारने औरंगजेबाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी गुंतवणुकीच्या समस्यांवर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.