मुंबई – भारतातील पाच प्रमुख कम्युनिस्ट पक्षांनी अमेरिकेच्या इराणविरोधी हवाई हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भाकप (मार्क्सवादी) चे महासचिव एम.ए. बेबी, भाकपचे महासचिव डी. राजा, भाकप (माले)-मुक्तीचे महासचिव दीपंकर भट्टाचार्य, आरएसपीचे मनोज भट्टाचार्य आणि फॉरवर्ड ब्लॉकचे जी. देवराजन यांनी संयुक्त निवेदनात ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग करणारी असल्याचे म्हटले आहे.
या हल्ल्यामुळे पश्चिम आशियात गंभीर युद्धजन्य अस्थिरता निर्माण झाली असून त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम होणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
नेत्यांनी लक्ष वेधले की, अमेरिका व इस्रायल यांनी इराणकडून आण्विक शस्त्र विकासाचा दावा केला असला तरी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक रॅफेल ग्रॉसी यांनी नुकतेच स्पष्ट केले की, “इराणकडून आण्विक शस्त्र तयार करण्याचा कोणताही पुरावा नाही.”
या पार्श्वभूमीवर १२ जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या दोन आठवड्यांच्या वाटाघाटी कालमर्यादेअगोदरच अमेरिकेने त्यात सहभाग घेतला.
“हे युद्ध साम्राज्यवादी उद्दिष्ट साधण्यासाठी आणि खनिज तेलावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केले जात आहे,” असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
कम्युनिस्ट नेत्यांनी भारत सरकारला आवाहन केले आहे की, ते अमेरिका-इस्रायलधार्जिण्या परराष्ट्र धोरणाचा त्याग करून युद्ध थांबवण्याच्या जागतिक प्रयत्नांत सक्रिय सहभाग घ्यावा.