महाड: राज्यातील सत्तांतर आणि नेतृत्वातील बदलानंतर अनेक शासकीय उपक्रम ठप्प झाल्याचे चित्र समोर येत आहे. महाडमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (MPCB) पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेली डिस्प्ले व्हॅन गेल्या काही महिन्यांपासून धुळखात पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या संकल्पनेतून ‘माझी वसुंधरा’ योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी ही सुसज्ज व्हॅन तयार करण्यात आली होती. बांबू लागवडीसारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
काही काळ महाड तालुक्यातील ग्रामीण भागात या व्हॅनद्वारे शेतकऱ्यांना चित्रफितींमधून मार्गदर्शन करण्यात आले. मात्र आता हीच व्हॅन महाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात अडगळीच्या जागेत उभी असून तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

या व्हॅनवर देशाचे पंतप्रधान Narendra Modi, तत्कालीन मुख्यमंत्री Eknath Shinde, विद्यमान मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची छायाचित्रे आहेत. मोठ्या थाटामाटात या व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले होते.
मात्र गेल्या सहा महिन्यांपासून लाखो रुपयांचा हा प्रकल्प पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत आहे. याबाबत विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनाही याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले.
एकंदरीत, नेतृत्वातील बदल आणि राजकीय घडामोडींनंतर पर्यावरण जनजागृतीसारखे महत्त्वाचे उपक्रम थंडावल्याचे हे उदाहरण मानले जात आहे.

