“उपाशीपोटी काम करावे, अशी सरकारची अपेक्षा आहे का?” — अविनाश रामिष्टे यांचा सवा
मुंबई: सातारा जिल्ह्यातील विविध शासकीय गोदामांमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस तसेच भाजप कामगार मोर्चाचे वरिष्ठ उपाध्यक्ष Avinash Ramishte यांनी केला आहे. सरकारने तातडीने थकीत वेतन न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
रामिष्टे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील शासकीय गोदामांतील माथाडी कामगार हे सातारा माथाडी असंरक्षित कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असून त्यांचे मासिक वेतन सुमारे २० हजार रुपये आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून सलग चार महिने त्यांना वेतन मिळालेले नाही. माथाडी अधिनियम १९६९ नुसार संबंधित नोंदणीकृत मालकाने प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपूर्वी मजुरी आणि लेवीचा भरणा करणे बंधनकारक असल्याचे रामिष्टे यांनी नमूद केले. धान्याच्या पोत्यांच्या चढ-उताराचे काम अत्यावश्यक सेवेत येत असून कामगारांनी काम बंद केल्यास जिल्ह्यातील धान्य पुरवठा विस्कळीत होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आंदोलन करू नये आणि काम बंद करणे बेकायदेशीर ठरेल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचा दावा रामिष्टे यांनी केला. “सरकार वेतनही देणार नाही आणि आंदोलनही करू देणार नाही, मग कामगारांनी जगायचे कसे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “जे कामगार जनतेपर्यंत वेळेवर अन्नधान्य पोहोचवतात, त्यांनाही कुटुंब आहे, त्यांनाही जगायचे आहे. जिल्हाधिकारी आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होते, मग कष्टकरी माथाडी कामगारांचेच पगार का रखडतात?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.
चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगत रामिष्टे म्हणाले की, “खिशात प्रवासासाठी पैसे नसताना कामगारांनी गोदामावर पोहोचायचे कसे?” सरकारने तातडीने निर्णय घेऊन थकीत वेतन द्यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी सातारा जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रातून दिला आहे.

